जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा : फडणवीस | पुढारी

जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा : फडणवीस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकार मराठा आरक्षणावर मार्ग काढण्याचे प्रयत्न करत आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

जरांगे-पाटील यांच्याबरोबरच्या लोकांनीही त्यांची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणाच्या विषयात लक्ष घालत आहेत. योग्य निर्णय झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न चालला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास ठेवला पाहिजे. दरम्यान, जरांगे-पाटील यांची तब्येत खालावत असल्याने त्यांचे उपोषण लवकरात
लवकर सोडवण्यात यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मागच्या वेळी उपोषण सोडवताना मनोज जरांगे-पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी करावी. जरांगे यांच्या तब्येतीची स्थिती बघता तातडीने निर्णय घेऊन आंदोलन सोडवावे ही आमची सरकारकडे मागणी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Back to top button