

मुंबई : राजेश सावंत, भारतीय जनता पक्षात सर्व आलबेल असल्याचे दाखवण्यात येत असले तरी, दक्षिण मुंबईत मात्र पक्षात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि माजी आमदार राज पुरोहित यांच्या गटात कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. नार्वेकर यांनी विचारणा केल्यावर त्यांच्या कार्यकत्यांनी लोकसभाऐवजी विधानसभेलाच प्राधान्य देण्याचा आग्रह धरला असून, दुसरीकडे पुरोहित गटाने नार्वेकर यांना विधानसभेचे तिकीट न मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. एकंदरीत दोन्ही बाजूने जोरदार गटबाजी होत असल्याने या वर्चस्वाच्या राजकारणात पक्षाचे कार्यकर्ते मात्र बिथरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.(Maharashtra Politics)
दिवंगत माजीमंत्री मुरली देवरा यांच्या कार्यकाळात कुलाबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जिंकत. २००९ च्या निवडणुकीत येथे काँग्रेसच्या अँनी शेखर यांनी बाजी मारली. मात्र पुढील निवडणुकीत (२०१४) या मतदारसंघातून भाजपचे राज पुरोहित विधानसभेत पोहोचले. त्यानंतर पुरोहित यांनी या भागावर पकड निर्माण केली. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे चार नगरसेवक निवडून आले. मात्र २०१७ मध्ये पक्षाने पुरोहित यांच्या सांगण्यावरून पक्षाने महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवक व कट्टर कार्यकर्ते जनक संघवी यांचा पत्ता कापून राज पुरोहित यांचे पुत्र आकाश यांना उमेदवारी दिली. यामुळे संतापलेल्या संघवी यांनी बंड करीत आकाश यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवली.दरम्यान, पुरोहित कुटुंबाने वर्चस्व वाढवतानाच पक्ष कार्यकत्यांकडे दुर्लक्ष सुरू केल्याने अनेक कार्यकर्ते पक्षापासून दुरावले. याची दखल घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत राज पुरोहित यांचाच पत्ता कापला. त्यांच्यासमोर राहुल नार्वेकर हा पर्याय उभा करण्यात आला. यामुळे पुरोहित गट नाराज झाला. तर नार्वेकर विधानसभेत पोहोचले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नार्वेकर यांनी भाजपच्या निवडक कार्यकर्त्यांशी चर्चा करताना लोकसभा निवडणूक लढवू का, अशी विचारणा केली. यावर कार्यकर्त्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढल्यास पुन्हा पुरोहित यांचे वर्चस्व वाढण्याची भीती व्यक्त करीत नार्वेकर यांच्याकडे विधानसभा निवडणुकच लढवण्याचा आग्रह धरला. तर दुसरीकडे पुरोहित गटाने नार्वेकर यांना विधानसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नार्वेकर यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुरोहित गटाने पक्षाकडे केल्याचे समजते. मात्र, नार्वेकर यांचे पक्षातील स्थान लक्षात घेता पुरोहित यांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षांतर्गत प्रयत्न करावे लागण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीत आपला मुलगा आकाश व सुन व आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी, यासाठी स्वतः पुरोहित आग्रही आहेत. पण नार्वेकर गटाचा विरोध असल्याचे समजते. मुंबई महानगरपालिकेमध्ये राजकीय वारसा असलेल्या उमेदवारांना उमेदवारी न देता भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणीही नार्वेकर गटाकडून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आहे.
हेही वाचा