पुढारी ऑनलाईन : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कामगिरीचा देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गाैरव करण्यात आला आहे. भारतरत्न असलेल्या व्यक्तीला जुगाराची जाहीरात करणे शोभत नाही, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. (Bacchu Kadu) सचिन तेंडुलकर यांच्या घरावर त्यांनी आंदाेलन केले. यावेळी ते (Bacchu Kadu) बाेलत हाेते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करत असलेल्या ऑनलाईन गेमिंग जाहिरातीवरून बच्चू कडू आक्रमक आले आहेत. माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांनी भारतरत्न सोडावा, अशी मागणी देखील केली. (Bacchu Kadu) भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांनी सचिन तेंडुलकर यांनी भारतरत्न परत द्यावा अशी घोषणाबाजी केली.
सचिन तेंडुलकर यांच्या बद्दल आदरच आहे. येथे भगतसिंग, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले यांना भारतरत्न भेटला नाही. ज्यांनी आपलं आयुष्य देशासाठी वेचलं त्यांना भारतरत्न मिळाला नाही. क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीमुळे देशाने त्यांचा आदर म्हणून भारतरत्न देण्यात आला, पण हे भारतरत्नचा अनादर करतात. यामुळे उद्या क्रिकेट खेळणारे जुगार खेळतील असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. जाहीरात करण्याला आमचा विरोध नाही, पण जुगारच्या जाहिराती करण्यास आमचा विरोध आहे. अशा जाहिराती आणखी कोणी देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त व्यक्ती करत असेल, तर आम्ही त्यांच्या विरोधात देखील आंदोलन छेडू असे देखील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटले आहे.
जुगाराची जाहिरातीचा प्रचार आणि प्रसार हा हे युवा पीढीसाठी धोकादायक आहे. सचिन तेंडुलकर यांना मानणारा एक मोठा युवावर्ग आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर सारख्या मोठ्या खेळाडुचा अशा प्रकारच्या चुकीच्या जाहिरातींमध्ये सक्रिय सहभाग असणे, त्यांना आयडॉल मानणारा एक युवावर्ग आहे. तो भावी पीढीसाठी धोकादायक आहे, असे मत देखील आंदोलनाकडून व्यक्त करण्यात आले आहे.