INDIA Alliance Meeting Mumbai | इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचं नियोजन ठरलं! लोगो अनावरण, डिनर कोण देणार? | पुढारी

INDIA Alliance Meeting Mumbai | इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचं नियोजन ठरलं! लोगो अनावरण, डिनर कोण देणार?

मुंबई, पुढारी ऑनलाईन : विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उद्या ३१ ऑगस्टपासून मुंबईत सुरुवात होईल. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. या बैठकीदरम्यान, इंडिया आघाडीच्या लोगोचे १ सप्टेंबर रोजी अनावरण केले जाणार आहे. तर उद्धव ठाकरे यांनी ३१ ऑगस्ट रोजी इंडिया गटाच्या बैठकीसाठी आलेल्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन केले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकी विषयी माहिती देताना सांगितले की, “बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे. शिवसेनेने इंडिया आघाडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत आहेत. इंडिया आघाडीतील नेते देशभरातून मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे.

विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ गटाने ३१ ऑगस्टपासून मुंबईत दोन दिवसीय बैठक आयोजित केली आहे. यादरम्यान विरोधी आघाडी त्यांचा लोगो जाहीर करणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुका तसेच २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटप यासारख्या धोरणात्मक मुद्द्यांवर विरोधी नेत्यांची चर्चा होण्याचीही शक्यता आहे.

कोठे होणार बैठक?

विरोधकांची तिसरी बैठक मुंबईच्या उपनगरातील ग्रँड हयात या आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहतील.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने ३१ ऑगस्ट रोजी ग्रँड हयात हॉटेलमध्ये येणाऱ्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी बैठक होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद होईल. विरोधकांची पहिली बैठक पाटणा येथे जूनमध्ये झाली. तर दुसरी बैठक जुलैच्या मध्यावधीला बंगळूरमध्ये पार पडली. तिथे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) नावाची घोषणा करण्यात आली होती. (INDIA Alliance Meeting Mumbai)

जागा वाटप जवळपास निश्चित?

दरम्यान, काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Congress leader Milind Deora) यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राज्यांमध्ये आघाडीमधील मित्रपक्षांत जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. अशी काही राज्ये आहेत ज्यांना अधिक वेळ लागेल. जिथे भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आहे अशा महाराष्ट्रात इंडिया गटातील मित्रपक्षांची एकजूट मजबूत असल्याच्या मुद्यावर त्यांनी जोर दिला आहे. या बैठकीत जागावाटप, समन्वय समितीची स्थापना आणि युतीसाठी निमंत्रक नेमण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Back to top button