INDIA Mumbai Meeting | जागा वाटप, लोगो अन् आणखी काही पक्ष येणार सोबत?, मुंबईतील ‘इंडिया’ बैठकीचा ‘हा’ आहे अजेंडा | पुढारी

INDIA Mumbai Meeting | जागा वाटप, लोगो अन् आणखी काही पक्ष येणार सोबत?, मुंबईतील 'इंडिया' बैठकीचा 'हा' आहे अजेंडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ गटाने ३१ ऑगस्टपासून मुंबईत दोन दिवसीय बैठक आयोजित केली आहे. (INDIA Mumbai Meeting) यावेळी विरोधी आघाडी त्यांचा लोगो जाहीर करु शकते. तसेच आगामी विधानसभा निवडणुका तसेच २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटप यासारख्या धोरणात्मक मुद्द्यांवर विरोधी नेत्यांची चर्चा होण्याचीही शक्यता आहे. याबाबतचे वृत्त ‘द टाईम्स ऑफ इंडिया‘ने दिले आहे.

आणखी कोणते पक्ष विरोधी गटात सामील होणार?

विरोधकांच्या तिसर्‍या बैठकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी सांगितले होते की या बैठकीदरम्यान आणखी काही राजकीय पक्ष २६ पक्षांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे. पण भाजपला टक्कर देण्यासाठी विविध पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नितीश कुमार यांनी संभाव्य पक्षांची नावे अद्याप उघड केलेली नाहीत. जी विरोधकांच्या गटात सामील होणार आहेत.

“आम्ही मुंबईतील आगामी बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘इंडिया’ गटाची रणनिती काय असेल? यावर चर्चा करू. यावेळी जागावाटपाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल आणि इतर अनेक अजेंडे निश्चित केले जातील. आणखी काही राजकीय पक्ष आमच्या युतीमध्ये सामील होतील,” असेही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी रविवारी सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी असलेल्या ३८ पैकी ४ ते ५ पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या संपर्कात आहेत आणि त्यातील काही आगामी काळात विरोधी गटात सामील होतील.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की ईशान्य भारतातील काही राजकीय पक्ष या बैठकीत सहभागी होतील.

एकतेचे प्रतीक असलेला लोगो?

मुंबईतील बैठकीदरम्यान इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. “यासंदर्भात चर्चा सुरू आहे. आम्ही १४० कोटी भारतीयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी आघाडीचा लोगो देशाचे एकतेचे प्रतीक असेल.” असेही त्यांनी सांगितले.

कोठे होणार बैठक?

विरोधकांची तिसरी बैठक मुंबईच्या उपनगरातील ग्रँड हयात या आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहतील.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट ३१ ऑगस्ट रोजी ग्रँड हयात हॉटेलमध्ये येणाऱ्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी बैठक होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद होईल. विरोधकांची पहिली बैठक पाटणा येथे जूनमध्ये झाली. तर दुसरी बैठक जुलैच्या मध्यावधीला बंगळूरमध्ये पार पडली. तिथे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) नावाची घोषणा करण्यात आली होती.

बैठकीचे आयोजन कोण करतंय?

शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीने विरोधी आघाडीच्या बैठकीच्या विविध पैलूंचे नियोजन करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या आहेत. तिन्ही पक्षांतील प्रत्येकी दोन नेत्यांचा समावेश असलेल्या या समित्या मीडिया, सोशल मीडिया, निवास आणि वाहतूक यासह इतर गोष्टी सांभाळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेस मीडिया आणि प्रसिद्धीचे काम सांभाळेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक व्यवस्था सांभाळणार आहे. ठाकरे गट निवास व्यवस्था पाहणार आहे. त्यासाठी ग्रँड हयात हॉटेलमध्ये २०० हून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत, असे पुढे सूत्रांनी म्हटले आहे. (INDIA Mumbai Meeting)

जागा वाटप जवळपास निश्चित?

दरम्यान, काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Congress leader Milind Deora) यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राज्यांमध्ये आघाडीमधील मित्रपक्षांत जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. अशी काही राज्ये आहेत ज्यांना अधिक वेळ लागेल. जिथे भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आहे अशा महाराष्ट्रात इंडिया गटातील मित्रपक्षांची एकजूट मजबूत असल्याच्या मुद्यावर त्यांनी जोर दिला आहे. या बैठकीत जागावाटप, समन्वय समितीची स्थापना आणि युतीसाठी निमंत्रक नेमण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Back to top button