मी अर्धवटराव तर फडणवीस दिल्लीकरांची आवडाबाई आहेत का?; उद्धव ठाकरेंचा टोला
पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘कोरोनाची लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केली,’ या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही, असे म्हणत प्रत्युत्तर दिले होते. शिवाय फडणवीस यांनी त्यांचा त्या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडिओ देखील ट्वीट केला होता. आता फडणवीसांच्या या टीकेनंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा पलटवार केला आहे. “मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे काय दिल्लीकरांची आवडाबाई आहेत का?” असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.
मुंबई येथे आज माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “मोदींनी लस तयार केली, या वाक्याला काय अर्थ आहे का? देवेंद्र फडणवीस असं बोलतील वाटलं नव्हत. मोदींनी लस कधी तयार केली? मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे काय दिल्लीकरांची आवडाबाई आहेत का? त्या चित्रपटात दोन पात्र होती अर्धवटराव आणि आवडाबाई, पण ते आता नावडाबाई झाले आहेत, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.
शिवसेनेचा १ जुलैला मुंबई महापालिकेवर ‘विराट मोर्चा’
मुंबई महापालिका विसर्जित झाल्यानंतर निवडणुका पावसाप्रमाणे लांबत चालल्या आहेत. काही ना काही कारणानं महापालिकेची उधळपट्टी सुरू आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी १ जुलैला शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे याचं नेतृत्व करतील. कोणत्याही कामासाठी महापालिकेचा पैसा बेधडक वापरला जातो. हा जनतेचा पैसा आहे त्याचा हिशोब द्यावा लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :