

ठाणे ः पुढारी वृत्तसेवा : 'लिव्ह इन'मध्ये राहणार्या प्रेयसीचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवून भटक्या कुत्र्यांना खायला घालण्याचा घृणास्पद आणि अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 56 वर्षीय प्रियकर मनोज साने याला अटक केली आहे. (Mumbai Crime)
ठाण्याच्या मीरा रोड भागात श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखाच हा क्रौर्याची परिसीमा ओलांडणारा प्रकार शेजार्यांनी केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गीतानगर फेज 7 मधील गीता आकाशदीप या इमारतीत 704 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साने (56) आणि सरस्वती वैद्य (39) लिव्ह इनमध्ये राहात होते. हा फ्लॅट सोनम बिल्डरच्या नावावर असून साने तेथे भाड्याने राहायचा. या दोघांचा अपार्टमेंटमधील कुणाशीही संवाद नव्हता. बुधवारी त्यांच्या फ्लॅटमधून कुबट व सडका वास येत असल्याने शेजारच्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या घरात प्रवेश केल्यावर ही धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांना पाहताच पळ काढणार्या मनोज साने याला लगेच अटक करण्यात आली.
मनोज साने हा 10 वर्षांपूर्वी बोरिवली येथे रेशनिंग दुकानात कामाला होता. तेथे सरस्वती साहित्य घेण्यासाठी येत होती. त्यावेळी त्यांची ओळख झाली. त्या ओळखीतून मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर त्या दोघांमध्ये 2014 पासून प्रेमसंबंध सुरू झाले. सरस्वती ही आश्रमात राहात असल्यामुळे तिला नातेवाईक नसल्याचे सांगितले जात आहे. तर मनोज याचे लग्न झाले नसून त्यालाही जवळचे नातेवाईक नसल्याचे पोलिसांनी सांगितलेे. गेल्या पाच वर्षांपासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.
पोलिसांनी सांगितले की, घराचे दार उघडताच दुर्गंधीचा असह्य उग्र दर्प आला. हॉलमध्ये झाड कापण्याचे कटर ठेवले होते. या कटरनेच साने याने प्रेयसीचे जवळपास शंभरावर तुकडे केले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. गळा दाबून खून केल्यानंतर शरीराचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक केले.
पोलिसांनी सांगितले की, मनोज साने याने रविवारी सरस्वती वैद्य यांचा गळा दाबून खून केला व त्यांच्या शरीराचे तुकडे केले. हे तुकडे त्याने नंतर मिक्सरमधून बारीक केले व ते गोळे कुकरमध्ये शिजवले. गेल्या तीन दिवसांत त्याने हे शिजवलेले मांस बाहेरच्या भटक्या कुत्र्यांना खायला घातले. बेडरूममध्ये पोलिसांना बेडवर प्लास्टिकच्या काळ्या पिशव्या आढळून आल्या तर किचनमध्ये तीन बादल्या रक्ताने होत्या. त्यात मोठ्या प्रमाणावर रक्त होते. तसेच त्यात मांसाचे काही तुकडेही होते, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनूसार, सरस्वती वैद्य या दाम्पत्यातील भांडण हे या हत्येचे कारण आहे. "हत्येमागे दाम्पत्यातील भांडण असल्याचे सांगण्यात येत असून त्यानंतर महिलेने विष प्राशन केले होते. पोलिसांनी त्याचा जबाब घेतला आहे. अधिक चौकशीत हत्येमागचे कारण पुढे येईल. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते म्हणाल्या की, एवढ्या मोठ्या समाजात त्या घटनेची कोणालाच माहिती नव्हती. मागच्या दोन-तीन दिवसांपासून एखादी व्यक्ती बेपत्ता असेल तर ती व्यक्ती धोक्यात असण्याची शक्यता आहे. आपण एकमेकांबद्दल सतर्क राहायला हवे तर अशा घटना घडू शकतात.
हेही वाचा