

मावळमध्ये शेतकर्यांवर गोळीबार करणारे; आजच्या बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांना लखीमपूर प्रकरणी आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच नाही. आजचा महाराष्ट्र बंद हा महाविकास आघाडी सरकारच्या ढोंगीपणाचा कळस आहे, असा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
लखीमपूरची घटना गंभीरच आहे. मात्र या घटनेचा आधार घेत महाराष्ट्रातील सरकार बंद करुन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहे. आज काहींजण लखीपूरची घटनेची तुलना ही जालियनवाला बागशी करत आहेत. मात्र ज्यांनी मावळमध्ये शेतकर्यांना गोळ्या घातल्या तेच आज आंदोलन करत आहेत, त्यांना आंदाेलनाचा नैतिक अधिकार आहे का, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. या सरकारने बांधावर जावून शेतकर्यांना आर्थिक मदत करणार असल्याची घाेषणा केली हाेती. सरकारने मोठ्या घोषणा केल्या मात्र कोणतीही मदत दिली नाही. शेतकर्यांना मदत करण्याची घोषणा हवेत विरली आहे. बेस्टच्या काही बसेस बंद करण्यात आल्या आहेत. हे ठरवून होत आहे. उच्च न्यायालयाने याची दखल घ्यावी. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा बंद करण्यास निर्बंध घातला आहे. आजचा बंद हा न्यायालयाचाही अवमान आहे. आम्ही राज्य सरकारच्या दुटप्पीपणाची निंदा करतो, असेही फडणवीस म्हणाले.
प्रशासनाचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारकडून दुकाने बंद ठेवण्याची सक्ती केली गेली. पोलिस, जेएसटी आणि प्रशासनाचा गैरवापर करुन व्यापार्यांना बंद पाळण्यास भाग पाडले जात आहे. राज्य सरकार हे बंद सरकार आहे. आमच्या काळातील सर्व योजना बंद केल्या. कोरोना काळात महराष्ट्र बंद केले. आता छोट्या व्यावसायिकांची गाडी रुळावर येत होती. तर सरकारनेच बंद पुकारला. या सरकारला नैतिक असेल तर आजचा बंद संपण्यापूर्वी महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकर्यांना पॅकेज जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.