बाभळ उगवली, कोकणाचा काय दोष; उद्धव ठाकरे यांची राणे यांच्यावर टीका | पुढारी

बाभळ उगवली, कोकणाचा काय दोष; उद्धव ठाकरे यांची राणे यांच्यावर टीका

सिंधुदुर्ग, पुढारी ऑनलाईन

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळामुळे कोकणच्या विकासाने भरारी घेतली आहे. आजचा दिवस कोकणासाठी आनंदाचा आणि मांगल्याचा आहे. मात्र, याला दृष्ट लागू नये यासाठी गालबोट लावण्यासाठी काही माणसेही येथे उपस्थित आहेत. कोकणच्या मातीत काही बाभळीही जन्माला आल्या आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार केला.

राणे यांनी आपल्या भाषणात ठाकरे यांच्यावर सूचक शब्दांत टीका केल्यानंतर ठाकरे यांनी राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मातीचा एक संस्कार असतो. आजचा दिवस हा आदळाआपट करण्याचा नाही. कोकणच्या मातीत काही बाभळी जन्माला आल्या आहेत. आपले संस्कार कसे विसरू नयेत हे विमान उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दाखवून दिले आहे. विमानतळासाठी तळमळीने बोलणे वेगळे आणि मळमळीने बोलणे वेगळे. कुणी काय केलं आणि करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे.

चिपी विमानतळामुळे कोकणचे वैभव ही संपन्नता आज आपण जगासमोर मांडणार आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असायला हव्यात तरच पर्यटन वाढते. विमानतळ ही मोठी सुविधा आहे. आपल्या शेजारचे राज्य गोवा पर्यटनदृष्ट्या विकसीत झाले. काहीजण कोकणचा कॅलिफोर्निया करतो अशा घोषणा करत होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की कॅलिफोर्नियाला लाजवेल असा कोकण करून दाखवतो. आज त्याची सुरुवात झाली आहे.

इतकी वर्षे विमानतळाला का लागली

विमानतळासाठी कुणी काय केले हे जनतेला माहीत आहे. आमचे सरकार आल्यानंतर विमानतळाने वेग घेतला हे सर्वांना माहीत आहे. पाठांतर करून बोलणे वेगळे. तळमळीने बोलणे वेगळे आणि मळमळीने बोलणे वेगळे असते. विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांशी बोलावे लागते. ते बोलणे अनेकदा कोरडे असते. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे हे तळमळीने बोलत होते. त्यांनी चीपीबरोबरच जळगाव, अकोला, अमरावती, सोलापूर, या विमानतळांची चर्चा केली. महाराष्ट्राचा विकास व्हावा ही त्यांची इच्छा आहे.

हे विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याचा माणस

कोकणात किल्ले आहेत, निळेशार पाणी आहे. ते जगाला दाखवण्याचा आमचा माणस आहे. आता किल्ला आपणच बांधला असे कुणीतरी म्हणेल. पण वास्तव नाकारत नाही. चीपी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा आमचा माणस आहे. या विमानतळावर येथे एक हेलिपॅड असावे. येथे हेलिकॉप्टरची राइड सुरू केली तर आपल्याला कोकणचे वैभव दाखवता येईल. कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. त्याची खरी सुरुवात आज झाली आहे. महाराष्ट्राच्या सर्व पक्षांचे नेते व्यासपीठावर आहेत. हा आनंदाचा क्षण आहे. मात्र, या आनंदाला कुणाची दृष्ट लागू नये यासाठी गालबोट लावले जाते तसे गालबोटही येथे आहे.

त्यांना खड्यासारखे बाजुला केले

उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव घेत टोला लगावला. ते म्हणाले, नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे खोटं बोलणे बाळासाहेबांना आवडत नव्हते. खोटं बोलणाऱ्यांना त्यांनी खड्यासारखे बाजुला केले. मी विकासकामांत कधीच राजकारण आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या फाइलसंदर्भात तुम्ही मला फोन केला. आणि एका क्षणात सही केली. कारण ते जनतेचे काम आहे.

मंत्रालयावरून टोला

राणे यांना त्यांच्या मंत्रालयावरूनही टोला लगावला. ते म्हणाले, नारायणराव तुमच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत. तुमच्याकडे लघू का असेना पण तुमच्याकडे ते खाते आहे. कोकणला, महाराष्ट्राला तुमच्याकडून काहीतरी मिळेल अशी मोठी अपेक्षा आहे. नारायणराव तुमच्या क्षमतांचा योग्य वापर करा. संधीची माती न करता सोने करा. विकासकामांत राजकीय जोडे आणू नका.

हेही वाचा : 

Back to top button