

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निराश आणि वैफलग्रस्त असल्यासारखे काम करत असल्याचे ते दिसत आहे. त्याची कारणे त्यांना शोधावी लागतील. बुधवारी (दि. २९) छत्रपती संभाजीनगरला तणावाची परिस्थिती निर्माण झाली हे राज्य सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी असं वातावरण निर्माण व्हावी, अशी या सरकारची इच्छा आहे. यासाठी मिंदे सरकारच्या टोळ्या काम करत आहेत, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी आज (दि. ३०) माध्यमांशी बोलताना केली.
"राज्य सरकार नपुंसक आहे का? जे सर्व काही मूकपणे पाहत आहेत? द्वेषयुक्त भाषण करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करू शकत नाही का? जर ते करू शकत नाही, तर आपल्याकडे राज्यच का आहे?", अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हिंदू संघटनांनी द्वेषयुक्त भाषणांविरुद्ध निष्क्रीयतेबद्दल दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी बुधवारी (दि.२९) राज्य सरकारला फटकारले होते. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे का,हेच समजत नाही. हे सरकार फक्त दिल्लीच्या आदेशानूसार काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर केलेली टिप्पणी बरोबरच आहे."
छत्रपती संभाजीनगरमधील तणावाला राज्य सरकारच जबाबदार आहे,. असा आरोपही राऊत यांनी केला. हा तणाव कोण निर्माण करत आहे? यासंबंधी राज्याच्या गृहमंत्र्यांना माहिती असायला हवी. दंगली वाढवण्याचे काम शिवसेना करत नाही तर बनावट शिवसेना करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. मागील दोन दिवसांमध्ये मंत्रालयासमोर तिघांनी जीवन संपवलं आहे. हे सरकार सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाही. बाहेर याच अस्तित्व दिसत नाही. हे खोके सरकार आहे. यासरकारचा जीव हा खोक्यात आहे. म्हणूनच या सरकारला सर्वोच्च न्यायलयाला नपुसंक म्हटलं आहे, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा