

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जोडे मारण्याची कृती ज्या सदस्यांनी केली. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते आणि वेगळ्या प्रकारचा अंकुश सदस्यांवर होईल अशी अपेक्षा होती. आम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. मात्र विधानसभा अध्यक्षांचा कल असा दिसला की, दिवसाच्या शेवटी याप्रकरणी निकाल द्यायचा, हे आम्हाला अजिबात मान्य नाही, ते आताच सांगितले पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम राहिलो. मात्र, अध्यक्ष निर्णय जाहीर करत नसल्याने सभात्याग केला असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या महाराष्ट्राला संस्कृती, परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांनी या राज्याचे नेतृत्व केले आहे. अशा दिग्गज नेत्यांचे पुतळे या परिसरात आहेत. त्याच परिसरात जोडे मारण्याची घटना घडली, त्याचा तीव्र शब्दांत निषेध केल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या घटनेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांची गटनेते व विरोधी पक्षनेते म्हणून भेट घेतली. त्यावेळी कुठल्याच राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत अशी घटना घडता कामा नये. असे कोण करत असेल. तर त्यांना निलंबित केले पाहिजे. शिवाय सभागृहात आमच्याकडून कुणी अपशब्द वापरले असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करा, अशी भूमिका मांडली. ही माहिती त्यांनी ऐकून घेतले. आणि आज सकाळी अधिवेशन सुरू होताच निर्णय घेतो असे आश्वासन दिले असेही अजित पवार म्हणाले.