Gautam Adani : अदानींना 'अच्छे दिन', महाराष्ट्र सरकार लवकरच देणार अदानींना 'हा' प्रोजेक्ट | पुढारी

Gautam Adani : अदानींना 'अच्छे दिन', महाराष्ट्र सरकार लवकरच देणार अदानींना 'हा' प्रोजेक्ट

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील गुंतवणूक सल्‍लागार कंपनी हिंडेनबर्गने दिलेल्‍या अहवालानंतर, गेल्या काही दिवसांपासून अदानी ग्रुप अडचणीत आला आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात  अदानी समूहाच्या (गौतम अदानी) शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्‍यान, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी ‘टाईम्‍स ऑफ इंडिया’शी बोलताना महाराष्ट्र सरकार ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’ औपचारिकपणे अदानी समूहाकडे सोपवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा एकदा अदानींना ‘अच्छे दिन’ येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकार धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे सोपवण्यासाठी लवकरच  ठराव  जारी करणार आहे. यासंदर्भात जीआर जारी करण्‍यात येईल; पण इयापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींवर काम करणे आवश्यक आहे. ते लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारने मुंबई धारावीचा पुनर्विकास करण्याची योजना तयार केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूह हा सर्वाधिक बोली लावणारा ग्रुप होता. याअंतर्गत अदानी यांच्या कंपनीसोबत करार करून झोपडपट्टी परिसर ग्रूप केला जाणार आहे. या प्रकल्पाचा फायदा परिसरातील झोपडपट्टीवासीयांना होणार आहे. या प्रकल्पांतर्गत धारावीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या पात्र लोकांना मोफत घरे मिळू शकणार असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्यावर्षी मंत्रिमंडळाकडून मंजुरी-उपमुख्यमंत्री फडणवीस

गेल्या वर्षी (२०२२) डिसेंबरमध्ये, मंत्रिमंडळाने हा प्रकल्प समूहाला देण्यास मान्यता दिली होती. परंतु यासंबंधी दुबईस्थित सेक्लिंक समूहाने हा प्रकल्प रद्द करण्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे सीईओ एसव्हीआर श्रीनिवास यांच्या मते,पुनर्विकास प्रकल्पासाठी प्राधिकरणाकडे सोपवल्या जाणाऱ्या ४७ एकर रेल्वेच्या जमिनीचे संयुक्त मोजमाप अंतिम टप्प्यात आहे. राज्य सरकारने २०१९ मध्ये जमिनीसाठी 800 कोटी रुपये अधिकचे भरले होते. आम्ही धारावी हातात घेत आहोत आणि जर एसबीयूटीचा पुनर्विकास होऊ शकला तर आम्हाला खात्री आहे की धारावीचाही हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button