मुंबई : पहिल्‍या दलित महिला आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचे निधन | पुढारी

मुंबई : पहिल्‍या दलित महिला आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचे निधन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: ‘माझ्या जल्माची चित्तरकथा’ या प्रसिद्ध आत्मचरित्राच्या लेखिका, पहिल्या दलित महिला आत्मचरित्रकार, शिक्षिका शांताबाई कांबळे (वय १०१) यांचे आज (दि.२५) निधन झाले. पुण्यात त्यांची मुलगी मंगल (गौरी) तिरमारे यांच्या निवासस्थानी शांताबाई कांबळे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री ८ वाजता नवी मुंबई कोपरखैरणे येथील स्मशानभूमीत बौद्ध पद्धतीने अंत्यविधी होणार आहेत.

शांताबाई कांबळे गरिब परिस्थितीतून शिक्षिका झाल्या. सांगली जिल्ह्यात शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे पुत्र दिवंगत अरुण कांबळे भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष होते. तर दुसरा मुलगा चंद्रकांत कांबळे निवृत्त मुख्याध्यापक आहेत.
शांताबाई कांबळे त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित नाजूका ही मालिका दूरदर्शनवर लोकप्रिय झाली होती. त्यांच्या  निधनाने आंबेडकरी चळवळीतील माझ्यासारख्या  कार्यकर्त्यांचे मातृछत्र हरपले आहे, अशी शोकभावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

हेही वाचा :  

Back to top button