नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा : माथाडी संघटनेत भेदभाव करणाऱ्या संघटनांचा बंदोबस्त केल्याशिवाय शांत राहणार नाही. नवी मुंबईतील सर्व प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले जातील. स्थानिक भूमीपुत्रांना न्याय दिला. सिडकोकडून ४८ कोटी रूपयांना हॉस्पिटलसाठी भूखंड दिला. गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न सोडवला. आणि आता माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न ही लवकरच सोडवले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते.
नवी मुंबई एपीएमसीत रविवारी (दि.२५) आण्णासाहेब पाटील यांच्या ८९ वी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार शशिकांते शिंदे, गणेश नाईक, मंदा म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, महेश शिंदे, माजी आमदार कृपाशंकर सिंह, माथाडी संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, पोपटराव देशमुख यांच्यासह माजी आमदार, खासदार, नगरसेवक, माथाडी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले, नव्याने आलेले सरकार हे देणारे सरकार आहे. सत्तेसाठी कोण आणि सत्यासाठी कोण हे जनतेला ठाऊक आहे. काही लोक सांगतात ही कंपनी गेली. ती कंपनी गेली. अडीच वर्षात किती उद्योग बाहेर गेले. ते सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
राज्यातील विकासकामे थांबता कामा नयेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. राज्यातील विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. त्यामुळे आता प्रगतीचा रथ आणि विकास कामे मार्गी लागतील. राज्याला विकासात मागे पडू देणार नसल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्याला दिशा देणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. अडीच वर्षात कामांना गती नव्हती. ती आता मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून नरेंद्र पाटील अध्यक्ष असताना ५० हजार मराठी उद्योजक तयार झाले. जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन त्यांनी बँकांच्या बैठका घेऊन मंडळाच्या वतीने उद्योग सुरू करण्यासाठी तरूणांना कर्ज मिळवून दिले. त्यांची कामाची योग्यता लक्षात घेऊन पुन्हा दुस-यांदा नरेंद्र पाटील यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नरेंद्र पाटील यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. पुन्हा या पदावर नरेंद्र पाटील चांगले काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.
माथाडी कामगार संघटनेत बोगस संघटना तयार झाल्याने इतर माथाडी कामगार संघटना धोक्यात आल्या आहेत. नेते ठेकेदार झाले आहेत. संघटनेच्या नावाने खंडणी उकळली जात आल्याबाबतचे वृत आज (दि. २४) 'दै. पुढारी'त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताची दखल घेतली आहे. माथाडी कामगारांच्या नावाने वसूली करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या जातील. जेलमध्ये टाकणाऱ्यांची माझ्याकडे कुणीही शिफारस घेऊन येणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आम्ही कागद बाजूला टाकणारे लोकं नाहीत, तर निवेदन स्वीकारणारे आहोत. यावेळी छत्रपती शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना चर्चा करताना सांगितले की, साताऱ्यातील भोंडारवाडीचे माथाडी एपीएमसीत अधिक आहेत. यावर फडणवीस यांनी काळजी करू नका, माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न ही लवकरच सोडवले जातील. घरांसाठी मुंबै बँकेकडून पैसे दिले जातील. पैसे कमी पडू देणार नाही. नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगारांचा लेव्हीचा प्रश्न तातडीने सोडवू. त्यामध्ये घोळ करणाऱ्यांचा समाचार सरकार घेईल, असेही स्पष्ट केले.
कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी २० सप्टेंबररोजी माथाडी कामगार संघटनेची बैठक झाल्याचे सांगत उर्वरित प्रश्नासाठी बैठक घेऊन सोडवले जातील. नाशिक मधील लेव्हीचा प्रश्न ही सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगार आणि नियमनातून मुक्त केलेल्या शेतमालाचा, घरांचा, खंडणी उकळणा-या बोगस संघटनांचा प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचलंत का ?