मुंबईबाबत केलेल्या विधानावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा माफीनामा | पुढारी

मुंबईबाबत केलेल्या विधानावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा माफीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. २९ जुलै रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात काही समाजाच्या योगदानाचे कौतुक करण्यात माझ्याकडून काही चूक झाली असावी, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताच्या विकासात प्रत्येकाचे विशेष योगदान आहे. विशेषत: संबंधित राज्याचे औदार्य आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या उज्ज्वल परंपरेमुळे आज देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे, अशीही भावना राज्यपालांनी व्यक्त केली आहे.

गेल्या तीन वर्षांत मला महाराष्ट्रातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा आदर वाढवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. पण वरील भाषणात माझ्याकडून चुकून काही चूक झाली असेल तर ही चूक महाराष्ट्रासारख्या महान राज्याचा अवमान मानण्याची कल्पनाही करता येणार नाही. महाराष्ट्राच्या थोर संतांच्या परंपरेतील या विनम्र राज्य सेवकाला क्षमा करून आपण आपले मोठे हृदय दाखवू , असेही भगतसिंग कोश्यारी यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button