

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचेल. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी साेमवारी (दि.१८) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
लक्ष्मण माने यांनी शरद पवारांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्यांचे पक्षात स्वागत करत आहे. गेली अनेक वर्ष लक्ष्मण माने हे राज्यातील भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी काम करत आले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेली ३० ते ४० वर्ष वाड्यावस्त्यांवर जाऊन वंचित घटकांना एकत्र करत आहेत. त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. शरद पवारांनी आजवर समाजातील नाही रे वर्गासाठीच अधिक निर्णय घेतले आहेत. समाजात अजूनही असा मोठा वर्ग आहे, ज्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. या निमित्त ३१ ऑगस्ट रोजी विमुक्त दिन साजरा करायचा आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल, असे लक्ष्मण माने यांनी जाहीर केले. लक्ष्मण माने यांच्यासमवेत विलास माने, नारायण जावलीकर, शारदाताई खोमणे, अशोकराव जाधव यांच्यासह १८ जणांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. या वेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.