मध्य प्रदेश एसटी बस अपघात : मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे एसटी महामंडळाला निर्देश | पुढारी

मध्य प्रदेश एसटी बस अपघात : मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे एसटी महामंडळाला निर्देश

[visual_portfolio id=”263903″]

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात महाराष्ट्राच्या एसटी बसला आज सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. ही बस इंदूरहून अमळनेरला येत होती. जळगाव एसटी डेपोची ही बस खलघाट येथील संजय सेतू पुलावरून २५ फूट खोल नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १२ जण ठार झाले असून. १५ जणांना वाचवण्यात आले. दरम्यान, अद्याप २५ ते २७ लोक बेपत्ता असून नदीपात्रात बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मध्य प्रदेशात एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.

या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुःख व्यक्त केले आहे. खलघाट येथील हृदयद्रावक दुर्घटनेने आपल्या अनेक लोकांना आपल्यापासून दूर नेले. हृदय दु:ख आणि वेदनांनी भरलेले आहे. या दुःखात मी शोकाकुल कुटुंबियांसोबत आहे, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत म्हटले आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची एमएच ४० एन९८४८ क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली.

Back to top button