resignation of uddhav thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द | पुढारी

resignation of uddhav thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याची घोषणा केली होती. यानंतर उद्धव ठाकरे राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करण्यासाठी स्वत: गाडी चालवत राजभवनात पोहचले होते. दरम्यान मुख्यमंत्री पदाबरोबरचं उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, आमदार अनिल परब, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, रमेश कोरगावकर, संतोष बांगर तसेच अन्य आमदार उपस्थित होते. (resignation of uddhav thackeray)

रस्त्याच्या दुतर्फा शिवसैनिकांची गर्दी, जोरदार घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री येथून निघाले तेव्हा मातोश्री निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देतानाच ‘उद्धवसाहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी जोरदार साद दिली. त्याचप्रमाणे राजभवनाबाहेरील रस्त्यावरही शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. या शिवसैनिकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.

राजीनामा दिल्यानंतर पूर्णवेळ शिवसेनेची धुरा सांभाळणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत. संजय राऊत यांनी हे ट्वीट करत म्हटले आहे की, उद्धव ठाकरे अत्यंत नम्रपणे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले. महाराष्ट्राने एक संवेदनशील मुख्यमंत्री गमावला आहे. शिवसेनेच्या भव्य विजयाची हि सुरूवात आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही, असे इतिहास सांगतो, असा टोलाही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. (resignation of uddhav thackeray)

लाठ्या खाऊ तुरूंगात जाऊ पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ, असेही संजय राऊत या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापुर्वी काही महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादचे-संभाजीनगर, उस्मानाबादचे-धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे- दि.बा.पाटील असे नामकरण करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. (resignation of uddhav thackeray)

हेही वाचलतं का?

Back to top button