

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेमार्फत विविध जलवाहिन्यांची दुरुस्ती व देखभाल कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये 13 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते गुरुवार 14 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
महानगरपालिकेमार्फत सी.बी.डी. से-28 पंप हाऊस येथे 1800 मी.मी. व्यासाचा व्हॉल्व बसविणे, भोकरपाडा 2.5 द.ल.लि. एम.बी.आर. येथे मुख्य जलवाहिनी जोडणी करणे, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील मुख्य जलवाहिनीवर 2400 मी.मी. व्यासाचा व्हॉल्व बसविणे, आदई येथे 1800 मी.मी. व्यासाचा व्हॉल्व बसविणे, स्काडा अंतर्गत कामे करणे, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रामध्ये विद्युत विषयक पावसाळा पूर्व दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
या पाणीबंदचा परिणाम बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच खारघर आणि कामोठे परिसरावर होणार आहे. त्यामुळे 13 मे रोजी संध्याकाळी तसेच 14 मे रोजी सकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
14 मे रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.