मुंबई : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी महिनाभर अटकेत असलेला नाशिकचा 22 वर्षीय निखिल भामरे याच्या याचिकेवरून सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला खडेबोल सुनावले.
तुम्हीच जर असे केले तर दुसर्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण मिळालेले शरद पवार यांच्या नावाला गालबोट लागेल. एका विद्यार्थ्याला अशा प्रकारे तुरुंगात डांबणे हे पवारांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वालाही आवडणार नाही, अशा शब्दांत न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. एम. जाधव यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. ठाणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवत ठाणे पोलिसांनी निखिल भामरेला गेल्या 18 मे रोजी अटक केली.
दररोज शेकडो आणि हजारो ट्विट केली जातात. तुम्ही प्रत्येक ट्विटची दखल घेणार आहात का? आम्हाला अशा प्रकारचे एफआयआर नको आहेत, असे न्या. शिंदे यांनी ऐकवले. या विद्यार्थ्याने केलेल्या आक्षेपार्ह कृत्याबद्दल जवळपास महिनाभर कारागृहात डांबून ठेवणे योग्य नाही. त्याच्या याचिकेला विरोध न केल्यास एका होतकरू तरुणाला वाईट मार्गापासून परावृत्त होण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही खंडपीठाने नमूद केले. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे पवारांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळेलाही दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिच्या याचिकेवरही उच्च न्यायालयात बुधवारी युक्तिवाद होणार आहे.
हेही वाचा