मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भीमा कोरेगाव प्रकरणी तपास करत असलेल्या आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या पक्षप्रमुखांना आपले म्हणणे मांडण्यासाठी समन्स बजावले आहे.
निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही साक्ष नोंदवली आहे. आता पाच पक्षप्रमुखांना आयोगाने समन्स पाठवले आहे. त्यांना ३० जूनपर्यंत त्यांचे म्हणणे मांडावे लागणार आहे.
३० जून किंवा त्यापूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. असे प्रतिज्ञापत्र दाखल केल्यावर आयोग साक्षीदारांना आयोगासमोर तोंडी पुरावे देण्यासाठी बोलावणार आहे.
पुण्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यभर दंगल उसळली होती. या प्रकरणी नेत्यांची मने जाणून घ्यायची आहेत. त्यामुळे त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये आयोगाची स्थापना केली होती.
हे ही वाचा :