बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा शकुनी समजू नका; पडळकरांचा संजय राऊतांना टोला | पुढारी

बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा शकुनी समजू नका; पडळकरांचा संजय राऊतांना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडीचं सरकार हे बहुजनांचं सरकार आहे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं होतं. त्यावर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार असल्याचा भयानक फसवा दावा आपण आपल्या सभेत केलात, कदाचित आम्हा बहुजनांना पण आपण काकाचा शकुनी हुजऱ्या समजत असाल. तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात ते बहुजन नव्हते का ?” असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे.

गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, “महाविकास सरकारच्या अडेलतट्टू धोरणामुळेच एससी, एसटी, ओबीसी, भटके विमुक्त यांचं पदोन्नतील आरक्षण मातीत मिळालं, ते तुमच्या बहुजन प्रेमातून आलं होतं का? गेल्या दोन वर्षांत एक हजाराच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का? शेतात पीकं असताना शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडणी केली, ते शेतकरी बहुजन नाहीत का?”, असे प्रश्न गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केले.

“धनगर आरक्षणासंबंधी एक साधी बैठकही तुम्ही अडीच वर्षातं करू शकला नाहीत. हे तुमचं कोणत बहुजन धोरणं होतं? सरकार स्थापनेच्या वेळेस तुम्ही प्रस्थापितांसोबत सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला, पण जेंव्हा आम्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात”, असाही आरोपी पडळकरांनी केला.

“कोर्टानं सांगूनसुद्धा तुम्ही अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता. मूळात तुमची इच्छा हीच आहे की, बहुजन पोरांनी तुमच्या सारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्याच उचलायच्या. बहुजनांचं दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवता. हे बहुजन समाज विसरलेला नाही. आपल्या बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबांडाचा तुम्ही रोज सकाळी उठून उधो उधो करता. हे बहुजनांचे हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावरसुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही. कारण त्याकरिता स्वाभिमान असावा लागतो”, असा टोमणा गोपीचंद पडळकरांनी संजय राऊतांना लगावला.

Back to top button