नवनीत आणि रवी राणा | आक्षेपार्ह वक्तव्ये, पण राजद्रोह नाही : मुंबई कोर्ट | पुढारी

नवनीत आणि रवी राणा | आक्षेपार्ह वक्तव्ये, पण राजद्रोह नाही : मुंबई कोर्ट

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर करताना हे निरीक्षण नोंदवलं आहे. राणा दाम्पत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. पण त्यांच्याकडून राजद्रोहाचा गुन्हा घडला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

राणा दाम्पत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेली वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. पण अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह वक्तव्ये ही भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ अ च्या तरतुदींनुसार देशद्रोहाचा गुन्हा लागू करण्यासाठी कारण ठरू शकत नाहीत. राजकीय नेते शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.

राणा दाम्पत्याला मंजूर केलेल्या जामीन अर्जाच्या सविस्तर १७ पानांच्या आदेशाची प्रत शुक्रवारी उपलब्ध झाली. २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, राणा दाम्पत्याने दावा केला की त्यांची घोषणा सार्वजनिक समर्थन मिळवण्यासाठी होती. मुंबई पोलिसांनी सांगितले होते की, त्यांचा हेतू हा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा होता. जेणेकरून सध्याचे सरकार बरखास्त करण्याची शिफारस केली जाऊ शकते.

विशेष न्यायाधीश आर एन रोकडे यांनी आदेशात म्हटले आहे की, प्रथमदर्शनी राणा दाम्पत्याकडून राजद्रोहाचा गुन्हा घडलेला दिसत नाही. मुंबईतील बोरिवली न्यायालयाच्या आदेशानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची काल गुरुवारी भायखळा तुरुंगातून सुटका करण्यात आली. यामुळे तब्बल १३ दिवस न्‍यायालयीन कोठडीत असणार्‍या राणा दाम्‍पत्‍याला मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणा यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa row) करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्‍या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात काल बुधवारी सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्‍पत्‍याला जामीन मंजूर केला. राणा दाम्पत्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटीशर्थींसह जामीन मंजूर केला. त्यानंतर गुरुवारी त्यांची सुटका करण्याची कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात पूर्ण झाली.

पत्रकारांशी संवाद साधू नये, पोलिस तपासात अडथळे निर्माण होतील असे कोणतेही कृत्‍य करु नये, साक्षीदारांना प्रलोभन दाखवणे अथवा त्‍यांच्‍यावर दबाव आणू नये, पुन्‍हा अशा गुन्‍ह्यात सहभागी घेवू नये, अशा अटी घालत विशेष न्‍यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्‍पत्‍याला प्रत्‍येकी ५० हजारु रुपयांची वैयक्‍तिक हमी तसेच तेवढ्याचर रकमेचे दोन हमीदार देण्‍याच्‍या अटींवर जामीन मंजूर केला आहे.

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर १२४ अ आणि ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची चांगलीच हजेरी घेत फटकारले होते.

 

Back to top button