

पुढारी ऑनलाईन डेस्क : एमआयएम सोबत महाविकास आघाडी हात मिळवणी करणार का? या प्रश्नावर शिवसेना काय भुमिका घेतेय हे पहायचयं, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची नुकतीच भेट झाली आहे. याबाबतची माहिती जलील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती. राजेश टोपे यांनी नुकतीच जलील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. राष्ट्रवादीशी युती करण्याची ऑफर दिल्याचे जलील यांनी म्हटले होते. यावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की भाजपला हरवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. जनता ही भाजपच्या पाठीशी आहे. महाराष्ट्राची जनता ही भाीजपलाच कौल देईल.
यावेळी महाविकास आघाडी एमआयएमशी हात मिळवणी करणार का या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, एमआयएमशी हात मिळवणी करायची का यावर शिवसेना काय निर्णय घेतेय ते पहायचंय.
दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात ३ पक्षांचचं सरकार राहील. एमआयएमची भाजपशी छुपी युती आहे. औरंगजेब ज्यांचा आदर्श आहे, अशा लोकांची आमची हातमिळवणी होऊ शकत नाही. औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे शिवसेनेसोबत येऊ शकत नाहीत. छत्रपतींच्या विचाराने आमचं सरकार काम करतं, असे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. हेही वाचा