काँग्रेसशिवाय आघाडी बनवायची असं कधीच म्हणालो नाही : संजय राऊत | पुढारी

काँग्रेसशिवाय आघाडी बनवायची असं कधीच म्हणालो नाही : संजय राऊत

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसशिवाय आघाडी बनवायची असं कधीच म्हणालो नाही, काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असं म्हटलं आहे. जेव्हा ममता बॅनर्जींनी असं सूतोवाच केलं होतं. त्‍यावेळी काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असं मत शिवसेनेने व्यक्त केलं होतं. असे मत मांडणारा शिवसेना पहिला पक्ष होता, असे संजय राऊत यांनी आज स्‍पष्‍ट केले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत. येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत म्‍हणाले की, “आघाडी वगैरे हे शब्द बदला. या देशांमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, पाचवी आघाडी हे प्रयोग कधीच यशस्वी झाल्याचे दिसले नाही. निवडणुका आल्या की आघाडीची चर्चा सुरू होते. रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्‍यांनी विविध विषयांवर चर्चा केली. अनेक मुद्‍यांवर सहमतीही झाली आहे. भविष्यातल्या राजकीय दिशा काय असावी, यावरही चर्चा झाली. भविष्यात या दोन नेत्यांनी शिवाय इतर अनेक राजकीय पक्षांचे नेते एकत्रित भेटणार आहेत”, अशी माहितीही राऊत यांनी सांगितले.

साेमय्‍यांवर टीका करताना मी खूपच सौम्य भाषा वापरली

सोमय्या यांच्यावर टीका करताना राऊत यांनी अपशब्द उच्‍चारले होते. याबाबत बोलताना राऊत म्‍हणाले, ” राजकारणाची भाषा बदलली आहे, असं मुळीच वाटत नाही. जे महाराष्ट्र द्रोही आहेत, जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं असं आमचे संत सांगून गेले आहेत. ‘तुका म्‍हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा’ असं म्हणत राऊत म्हणाले की, अशा लोकांची काय पूजा करावी, का मिरवणूक काढावी. एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर ठुमकत असेल तर मला वाटतं मी खूपच सौम्य भाषा वापरली आहे”.

चंद्रकांत पाटलांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा

मी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून या पक्षाच्या मुख्य प्रवाहात आहे. मी ठाकरे कुटुंबासोबत आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला न्याय देण्याची गरज नाही त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा, असं देखील राऊत म्हणाले. राऊतांनी म्हटलं की, भाजपची सवय आहे, जेव्हा ते पराभूत व्हायला लागतात तेव्हा अशा पद्धतीचे आरोप करतात. उत्तर प्रदेशात भाजप पराभूत होत आहे. त्यामुळे त्यांचे अखेरचे प्रयत्न सुरू आहेत. देशात लोकशाही संपत आहे, त्याचेच हे परिणाम आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.

माहिती काढण्यासाठी मला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटायची गरज नाही

काल नागपूरच्‍या पोलीस आयुक्तांना भेटलो सदिच्छा भेट होती ते मुंबईलाही अधिकारी राहिलेले आहेत म्हणून नागपुरात आल्यावर त्यांना भेटलो. माहिती काढण्यासाठी मला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटायची गरज नाही. त्यांच्याबद्दल सर्व काही आहे. त्यांच्या संदर्भात लवकरच बोलेन. शक्यतो नागपूरला येऊनच बोलणार आहे. नागपूर नक्कीच आता बदले आहे. कोरोनामुळे नागपुरात येऊ शकलो नाही, मात्र आता हळूहळू माझ्या नागपूरच्या फेर्‍या वाढतील, असं राऊतांनी सांगितले.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

 

 

Back to top button