

Mumbai Mayor Will Be Marathi and Ours Say's Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी थेट शब्दांत सांगितलं की, “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार.” या विधानानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनीही मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा संदर्भ देत मराठी माणसाच्या संघर्षाची आठवण करून दिली. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी मराठी माणसाने मोठं बलिदान दिलं असून, आज ठाकरे बंधू एकत्र बसले आहेत, हे त्याच इतिहासाचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे हे पहिल्या पाच सेनापतींपैकी एक होते, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाने त्या काळात मुंबईसाठी संघर्ष केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईला वेगळं करण्याचा, अथवा मराठी माणसाला या शहरापासून दूर करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर त्याला संपविल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. “शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी युती ही केवळ निवडणुकांसाठी नसून, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी असल्याचं अधोरेखित केलं.
भूतकाळातील राजकीय फूट आणि अपप्रचाराचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला थेट आवाहन केलं. “आता चुकण्याची वेळ नाही. जर पुन्हा फूट पडली, तर मोठं नुकसान होईल. तुटू नका, फुटू नका आणि मराठीपणाचा वारसा टाकू नका,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. या युतीच्या माध्यमातून एकजूट दाखवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांची महापौराबाबतची घोषणा आणि उद्धव ठाकरे यांचा आक्रमक निर्धार, यामुळे आगामी महापालिका निवडणुकांआधीच मुंबईचं राजकारण तापलं आहे.