हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील साई गल्ली भागात विजेच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. तर अन्य 4 जण भाजल्याने जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि.२७) सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. संतोष गंगाधर दळवी ( वय 35, कुरुंदा ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
कुरुंद्यातील साई गल्ली भागात संतोष गंगाधर दळवी यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या टीनपत्र्यावरून विद्युतवाहिनी जाते. ही वाहिनी कट झाल्यामुळे घरावरील पत्र्यांत वीज प्रवाह उतरला होता. हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. आज सकाळी 7 च्या सुमारास गंगाधर दळवी घरात वाळत घातलेला टॉवेल काढण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का बसला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संतोष दळवी यांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही विजेचा धक्का बसला.
यावेळी तिथे असलेले त्यांचे भाचे भागवत पांडव, महेश पांडव व संतोष दळवी यांची पत्नी देखील विजेच्या धक्क्याने जखमी झाले. सदर प्रकार शेजार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. पण पावसामुळे वीजपुरवठा खंडित करता आला नाही. त्यामुळे त्यांनी 33 केव्ही उपकेंद्राला या घटनेची माहिती दिल्यानंतर संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
संतोष दळवी व महेश पांडव यांना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी संतोष दळवी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमध्ये गंगाधर दळवी, भागवत पांडव व संतोष दळवी यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर महेश पांडव यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू असल्याचे कुरुंदा पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नाही. कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार बालाजी जोगदंड, प्रदीप साळुंखे यांच्या पथकाने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस केली. दरम्यान, मयत संतोष दळवी हे टोकाई सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरीवर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली असा परिवार आहे.
हेही वाचा