परभणी: पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून बालकाचे अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह घरात पुरून ठेवला. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना कळगाव (ता. पूर्णा) (Parbhani Crime) येथे आज (दि. १७) उघडकीस आली. याप्रकरणी कावेरी गजानन बनगर आणि अन्नपूर्णा बाळासाहेब बनगर या सासूसुनेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कळगाव परिसरातील सिद्धेश्वर येथील गणेश भिमराव धोत्रे यांची पत्नी शुक्रवारी (दि.१३) शेतातून घरी परत आली. यावेळी त्यांचा मुलगा गोविंद गणेश धोतरे (वय ३) कुठेही आढळून आला नाही. शोधाशोध केल्यानंतर त्यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात (Parbhani Crime) फिर्याद दिली.
त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी अधिकारी वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार व्यंकट कुसमे, फौजदार साईनाथ पुयड यांच्या पथकाने बालकाचा शोध सुरू केला. त्यावेळी गणेश धोत्रे यांच्या शेजारी राहणार्या कावेरी बनगर हिनेच बालकाला जीवे मारल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर कावेरीची ताडकळस पोलिसांनी कसून चौकशी केली.
जुन्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने गोविंद धोत्रे याचा खून केल्याची कबुली कावेरी बनगर हिने पोलिसांना दिली. गोविंद अंगणात खेळत असताना त्यास उचलून घरात नेले. आणि सासू अन्नपूर्णा हिच्या मदतीने त्याला जीवे मारून घराच्या एका कोपर्यात त्याचा मृतदेह पुरला, अशीही कबुली दिली. याप्रकरणी दोघींना अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रामोड अधिक तपास करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचलंत का ?