

Uddhav Thackeray Slams BJP
परभणी, पुढारी वृत्तसेवा : "शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी राबववले 'ऑपरेशन टायगर' नसून, 'ऑपरेशन फडणवीस' होते. भविष्यात देवेंद्र फडणवीस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येतील, या भीतीने अमित शहा यांनी त्यांचे पंख कापण्यासाठीच हे कारस्थान रचले," असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. २८ ) केला. परभणी येथे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर चौफेर टीका केली.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या भाजपमध्ये पक्षातील fhj[ नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला केले जात आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव आता कुठे दिसत नाही. नितीन गडकरी यांचेही पंख कापण्यात आले. आता देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही तेच सुरू आहे. फडणवीस दिल्लीच्या शर्यतीत येऊ नयेत, म्हणूनच अमित शहा यांनी शिवसेनेचे सहा खासदार फोडण्यासाठी 'ऑपरेशन फडणवीस' राबवले," असा थेट आरोप उद्धव ठाकरे केला.
अयोध्या राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराचा उल्लेख करत ठाकरेंनी भाजपवर 'हिंदुत्वाशी गद्दारी' केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "तुम्हाला मंदिर बांधायचे नव्हते, तर लुटायचे होते. आताची भाजप ही नवीन भाजप असून ती 'बाबर जनता पार्टी' झाली आहे. तुमच्यात आणि बाबरी मानसिकतेत काय फरक उरला आहे? आम्ही शिवरायांचे आणि शेतकऱ्याला हक्काचा दाम देणारे खरे हिंदुत्व मानतो."
. "ही माझी हक्काची माणसे आहेत. इथे खुर्च्यांशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट भाड्याने आणलेली नाहीत, असे स्पष्ट करत फुटीर खासदारांवर निशाणा साधताना ते म्हणाले. "मला काय माहित होते, वाघाचे कातडे पांघरून कोण बसले होते? ते तर लांडगे निघाले आणि पळून गेले. आज शेतकरी उपाशी आहे आणि हे गद्दार खाजगी विमानाने बेशरमपणे फिरत आहेत. हा दलाल डोलारा उभा करायला पैसा कुठून आला?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गेल्या २४ तारखेला अरविंद सावंत हे अध्यक्षांच्या सूचनेनुसार कारगिल दौऱ्यावर होते, तरीही अध्यक्षांनी 'तुम्ही इथे या' असा दबाव आणला. लोकप्रतिनिधी म्हणजे काही संपूर्ण पक्ष नव्हे. संविधानात अनेक गोष्टी स्पष्ट लिहिल्या आहेत. देशात जर कायद्याचे राज्य असेल आणि लोकसभा अध्यक्ष कायद्याला मानणारे असतील, तर हे सर्व फुटीर खासदार अपात्र ठरलेच पाहिजेत. आम्ही कायद्याची मर्जी मानतो, व्यक्तीची नाही," असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
परभणीकरांचे आभार मानताना ठाकरे म्हणाले, "तुम्ही शिवसेनेचा हक्काचा महापौर निवडून दिलात. तो मुसलमान आहे म्हणून माझ्यावर टीका झाली; पण तो आधी 'शिवसैनिक' आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडलेले नाहीत." तसेच, "माझी चूक झाली की मधल्या काळात मी तुमच्याकडे जास्त लक्ष देऊ शकलो नाही. पुन्हा जोमाने कामाला लागतो," असेही त्यांनी नमूद केले.