

Parbhani Sugarcane transport is being hampered due to lack of a flyover
आनंद ढोणे
पूर्णा : येथील पूर्णा- नांदेड-पूर्णा-अकोला रेल्वे लोहामार्गावर नांदेड विभाग दमरे महारेल खात्या अंतर्गत रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम सध्या स्थितीत पूर्ण केले आहे. परंतु, सदर रेल्वे उड्डाण पूलाचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला केला नाही. परिणामी, दरवर्षी प्रमाणे उड्डाणपूल शेजारी तयार करुन दिलेल्या खड्डेमय चढाच्या रस्त्यावरुन यंदा देखील बळीराजा साखरकारखान्याकडे गाळपासाठी ऊस वाहतूक करणे ट्रक ट्रॅक्टर वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या रस्त्यावरुन ऊस वाहतूक करण्यासाठी मोठी कोंडी निर्माण झाली आहे. चढ रस्त्यावरुन ऊसाची वाहने चालविणे मुश्किल झाले आहे. वाहतुक करताना चढाचा रस्ता लागताच ट्रॅक्टर इंजिनचे पुढील चाके उचलताहेत. भरतीची वाहने मोठी कसरत करून रस्ता काटत असताना ते पलटी होण्याची जोखीम निर्माण झाली आहे. असी कसरत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास मागील तीन वर्षांपासून करावी लागत आहे.
यंदा येथील रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण झाले तरी दमरे महारेलने पुलाचे बांधकाम बहाल केलेल्या गॅलकोन ईन्फास्ट्रक्चर बांधकाम कंपनीच्या दिरंगाईमुळे वाहतुकीसाठी उड्डाणपूल उद्घाटन करुन वाहतुकीसाठी खुला केला जात नाही. शिवाय, सदर उड्डाणपूलाचा गुत्तेदार पुलाशेजारील पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करत नाही. हे रस्ते रुंदीकरण न करता तसेच सोडून दिले आहेत. अरुंद रस्त्यामुळे हयातनगर, सुहागान शेतीक्षेत्र भागातील ऊस वाहतूक ठप्प झाली आहे.
हा अरुंद रस्ता रुंदीकरण करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी प्रकाशराव ढोणे, नागोराव शिंदे, बळीराम भोसले, गणेश भोसले, दाजीबा भोसले, माऊली भोसलेंसह आदींनी रेल्वे विभाग तहसीलदार यांना निवेदन देवून कळवले आहे. परंतु, उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांच्या दिरंगाईमुळे रस्ता रुंदीकरणाचे काम अद्यापही रखडले आहे.
दरम्यान, रेल्वे उड्डाणपूलाचे गुत्तेदार पुल बांधकाम पूर्ण झाले म्हणून रेल्वे विभागास कळवत नाहीत. एकीकडे उड्डाणपूलाच्या बाबतीत असी जरी परिस्थिती असली तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचा ऊस रेल्वे उड्डाणपूलारील वाहतुकी अभावी गाळपासाठी जाणे अवघड झाले आहे. याकडे आता पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी तरी ही समस्या लक्षात घेऊन त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे.