जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज (दि.२४) सकाळी ११ च्या सुमारास येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांसह नागरिकांची मोठ्याप्रमाणावर जलसमाधी आंदोलनाला उपस्थिती लावली होती. अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे - पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व सरकारच्या वेळ काढून धोरणाचा जाहीर निषेध म्हणून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. (Parbhani News)
मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे अध्यादेश काढावा, या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत. अगोदरच मागील अनेक वर्षांपासून उपोषणे आंदोलने करून त्यांच्या शरीराची झीज झाली आहे. त्यांच्या कायदेशीर मागण्यांचा सरकार मुद्दामहून काही एक विचार करत नसताना दिसत आहे. शिवाय धाराशिव येथे धनंजय पाटील यांच्या उपोषणाकडे देखील दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजामध्ये सरकार विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. सरकार जोपर्यंत मराठा समाजाच्या व जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करत नाही. तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच राहणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले. (Parbhani News )
यावेळी मराठा समाजाच्या वतीने सरकारने लवकर सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यां करत जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलन स्थळी तहसिलदार राजेश सरवदे, नायब तहसिलदार प्रशांत राखे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्यासह घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.