मानवत, पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी पालक वर्गांकडून येत होत्या. आज (दि.२९) सकाळी सात वाजता भरलेल्या इयत्ता सहावीच्या वर्गावर ९ वाजून २० मिनिटांपर्यंत शिक्षक न आल्याने शिक्षकांशिवाय वर्ग भरला. याबाबत एका पालकांने तक्रार केली आहे. Parbhani News
याबाबत अधिक माहिती अशी की, मानवत येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मागील काही महिन्यांपासून शिक्षक सतत गैरहजर राहून वर्ग वाऱ्यावर सोडत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. आज इयत्ता सहावीतील एका विद्यार्थ्याचा पालक आपल्या पाल्याला जेवणाचा डब्बा घेऊन आला होता. यावेळी सकाळी ९ वाजून २० मिनिटे झाले, तरीही वर्गावर शिक्षक आलेला नव्हता. त्याने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विचारले की, वर्गावर सकाळ पासून शिक्षक आले नाहीत का ? तर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक आलेच नाहीत, असे सांगितले. Parbhani News
याबाबत शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. त्यानंतर गणेश शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यावर केंद्रप्रमुख शिरीष लोहट यांनी तत्काळ त्या वर्गावर शिक्षकाची व्यवस्था करण्याच्या सुचना मुख्याध्यापकांना दिल्या. अखेर १० च्या सुमारास त्या वर्गावर शिक्षक गेला. परंतु तीन तास शिक्षकांशिवाय वर्ग भरलेला होता. विद्यार्थी बसून आपापल्या पद्धतीने पुस्तक वह्या उघडून बसले होते. गटशिक्षणाधिकारी यांनी या प्रकारची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालक वर्गांतून होऊ लागली आहे.
झाला प्रकार समाज माध्यमातून शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत कळल्याने तत्काळ उपस्थित असलेल्या शिक्षकांनी सदर पालकाची समजूत काढण्यासाठी त्यास पाचारण केले. व त्यांना पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असा शब्द देऊन समजूत काढण्यामध्ये ते व्यस्त राहिले. परंतु, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी केवळ एक शिक्षक वेळेत येतात. बाकीचे कोणतेही शिक्षक वेळेत वर्गावर येत नाहीत. किंबहुना अभ्यास समजून सांगत नाहीत, असे सांगितले.
हेही वाचा