

आनंद ढोणे
पूर्णा: तालुक्यातील 6 ही महसूल मंडळात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अनेकदा ढगफुटीसदृष्य मुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी झाली. या नैसर्गिक आपत्तीत अभाळ फाटल्याने नदी नाल्यांना मोठे पूर येवून त्या काठची सारी शेतशिवारं खरडून गेली. त्यासोबतच खरीपातील सोयाबीन कापूस तूर उडीद मुग भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले.
आता अतिवृष्टी पाऊसानंतर चार दिवसांपासून उघडीप दिली आहे. सातत्याने अतिवृष्टीत पिचलेल्या सोयाबीन पिकांची अवस्था दयनीय दिसत असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेलाय. शेतकरी नेस्तनाबूत होवून यातून आता सावरायचे कसे? त्यातच शासन संपूर्ण वाया गेलेल्या पिकापोटी अतिशय तुटपुंजे आनूदान माथी मारत आहे. प्रति गुंठा ८५ रुपये आनूदानातून शेतकऱ्यांचे भागेल काय? असे नानाविध सवाल शेतकऱ्यांपुढे आवासून उभे ठाकलेत. यातच सध्या शंभर टक्के पिकं बाधीत झाली असता केवळ ४० ते ६० टक्केच क्षेत्र बाधीत ग्रहित धरुन महसूल विभागाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.Marathwada flood
स्थानिक महसूल खात्याकडून अनुदान रक्कम प्रदान करण्यासाठी बाधीत शेतकऱ्यांच्या याद्या अपडेट्स करण्याचे काम चालू आहे. काही ठिकाणी ईकेवायशी करण्याकरीता विशीष्ट क्रमांकासह याद्या प्रसारीत केल्या जात आहेत. परंतु, दिल्या जाणाऱ्या याद्यांव्दारे अनुदान रक्कम मात्र अतिशय कमी येत असल्यामुळे शेतकरी सरकारविरुद्ध संतप्त झाला आहे. अनुदान असे दिले जात आहे की ते बँकेत घ्यायलाही परवडणाशे झाले आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असता त्या मानाने अनुदान काहीच नाही. सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा मांडली असल्याचे यावरुन दिसून येत आहे.
अतिशय तोकड्या अनुदान रक्कमेमुळे ठिकठिकाणी शेतकरी शासनाचा धिक्कार करत असून असे अनुदान आम्हाला नकोच म्हणून सांगताहेत. पाऊसाच्या उघडीपीनंतर शेतात जावून सोयाबीन पिकाकडे पाहीले असता ते कापणी करायला शुध्दा उरले नसल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण काळेभोर पडून जागेवरच झिरपले आहे. अशा भयानक परिस्थितीत शेतकऱ्यांनी आता करायचे काय? कसा घरसंसार खर्च चालवावा? मुलाबाळांचे शिक्षण,दवाखाना खर्च, दिवाळी कसी साजरी करायची? असे प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. डोळ्यासमोर घरसंसार लेकरं दिसताहेत. त्यांना जगवण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
कवडीमोल अनुदानातून काय होणार आहे? देवानं दिलेलं सरना अन् माणसानं दिलेलं पुरना" अशी भयाण अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यातच आता अतिवृष्टीमुळे खरीप गेला निदान रब्बी हंगामात तरी गव्हू, हरबरा, ज्वारी ही पिके घेता येवू शकतील, परंतू शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्याकडे रब्बी पिकं घेण्यासाठी एक दमडीही शिल्लक राहीली नाही. तेव्हा सरकारने रब्बी हंगामासाठी बि बियाणे खते तरी शंभर टक्के अनुदान देवून दिलासा द्यावा, अशी हाक शेतकरी सरकारला देत आहे.