

परभणी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत भाजपाची शतप्रतिशद भाजपाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावल्यामुळे भाजपाला ग्रामीण भागातही जनाधार मिळताना दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 24 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी स्वतःचे नेतृत्व सिध्द करत जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी 11 जागा जिंकत मतदारसंघावर आपलाच वरचष्मा कायम असल्याचा संदेश दिला आहे. मागील अनेक वर्षापासून भाजपा जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत भाजपासाठी प्रयत्न करत असताना त्यांना अपेक्षित यश प्राप्त झाले नव्हते.
नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाने महापालिका निवडणुकीतही जोरदार ताकद लावत मनपामध्ये सत्तेचे स्वप्न पाहिले होते, परंतु मनपामध्ये सत्तेचे स्वप्न भंगल्यानंतर जिल्हा परिषदेत जोरदार कमबॅक करत पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी स्वतःला सिध्द करत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपा मुसंडी मारताना दिसून येत असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निवडणुकीत 6 तर शिंदेंच्या शिवसेनेला 5 जागा मिळाल्या आहेत.
जिल्हा परिषदेत शिंदे शिवसेनेने प्रथमच प्रवेश करत जिल्हा परिषद सत्तेचे भागीदार बनण्याची संधीही शिवसेनेला मिळाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आजतागायत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यश मिळायचे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था मात्र विरोधकांच्या ताब्यात राहायच्या. पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राजेश विटेकर, माजी आ.विजय भांबळे यांना एकप्रकारचा धक्का दिल्याचे मानले जात आहे.
भाजपामध्ये जुने -नवे हा वाद अधूनमधून चर्चेला जात असतानाच ग्रामीण भागात भाजपचा जणाधार वाढत शतप्रतिशतच्या दिशेने पक्षाचा प्रवास सुरू झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेची मागील जिल्हा परिषदेतील सदस्यसंख्या 13 वरून घटली असून दोन्ही शिवसेनेला मिळून 11 जागा मिळाल्या आहेत. एकंदरीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप बाळसे धरू लागले असून हा राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेलाही धक्का मानला जात आहे. भाजपाबरोबरच शिंदेची शिवसेनाही जिल्हयात हातपाय पसरताना दिसत आहे.
अनेक राजकीय पक्षांची सदस्य संख्या घटली
जिल्हा परिषदेत 24 जागा पटकावत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनला असताना इतर राजकीय पक्षांची सदस्य संख्या मात्र घटली आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 24 सदस्य होते, त्यात घट होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या 15 वर आली आहे. मागील जिल्हा परिषदेत एकत्रित असलेल्या शिवसेनेची सदस्य संख्या 13 होती, त्यात 7 जागांची घट झाली असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सदस्य संख्या 6 वर आली आहे.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे 6 सदस्य निवडून आले होते, काँग्रेसच्या 3 जागा घटल्या असून काँग्रेसची सदस्य संख्या 3 वर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेने 5जागा पटकावत जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केला आहे. कावलगाव सर्कलच्या रूपाने एका अपक्ष उमेदवारानेही जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे.