

हिंगोली ः पोलिस दलामधील 64 पदांच्या भरती प्रक्रियेला बुधवारपासून सुरळीत सुरवात झाली असून सकाळी साडेचार वाजल्या पासूनच तयारी करण्यात आली. यावेळी प्रथमच आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून त्यामुळे धावण्याच्या चाचणीमध्ये उमेदवारांची अचूक वेळ नोंदवली जात आहे. पोलिस अधीक्षक निलाभ रोहन मैदानावर तळ ठोकून होते.
हिंगोली पोलिस दलाच्या 64 पदांसाठी तब्बल 13200 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर बुधवारी सकाळपासून संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरवात झाली. पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांचे पथक भरती प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत.
बुधवारी सकाळी साडेचार वाजल्या पासूनच उमेदवारांना मैदानावर प्रवेश देण्यात आला. सुमारे 900 उमेदवार चाचणीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शारीरिक मोजमाप करण्यात आले. त्यानंतर 1600 मीटर धावणे व गोळाफेक चाचणी घेतली जात आहे. जिल्हा पोलिस दलाची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
यामध्ये धावण्याच्या चाचणीमध्ये उमेदवारांच्या धावण्याची अचूक वेळ नोंदविण्यासाठी आरएफआयडी याचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये उमेदवारांच्या पायाला सेन्सर बसविण्यात आले असून धावण्याच्या सुरुवातीपासून ते शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यात अचूक वेळ नोंदविली जात आहे. या शिवाय मैदानावर 40 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे.
या शिवाय भरती प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मैदानावर मोबाईल घेऊन येण्यास मनाई करण्यात आली असून भरतीसाठी नियुक्त न केलेले पोलिस कर्मचारी मैदानाच्या परिसरात दिसल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिल्या आहेत.
पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या निवासाची व्यवस्था पोलिस वसाहतीच्या कम्युनिटी हॉलमध्ये करण्यात आली. त्या ठिकाणावरून उमेदवारांना संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर आणण्यासाठी पोलिस दलाकडून वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय मैदानावर आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.