

14 acres of sugarcane burnt in Kalgaon Shivara due to short circuit
ताडकळस, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालुक्यातील कळगाव शिवारात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल १४ एकर ऊस जळून खाक झाला. सहा शेतकऱ्यांचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी (दि.५) दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली. सध्या ऊस तोडणीचा हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर आला असताना एक वर्ष मेहनतीने उभा केलेला पिकाचा घास हातातोंडाशी येताच निसर्ग आणि व्यवस्थेच्या दोषांमुळे हिरावला गेला.
सदर आगीचा स्रोत हा शॉर्टसर्किट असल्याचे समजते. त्यादिवशी दुपारी लाईट आल्यावर अचानक विद्युत तारेत शॉर्टसर्किट झाले व त्यातून पडलेल्या ठिणग्यांमुळे ऊसाला आग लागली. सुरुवातीला काही भागापुरती मर्यादित असलेली आग वाऱ्याच्या झोताने झपाट्याने पसरली. आसपासच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने इतके रौद्ररूप धारण केले की ती आटोक्यात आणणे अशक्य झाले.
या आगीमुळे सुभाष निवृत्ती सूर्यवंशी गट नं. २१, संकेत सुरेश सूर्यवंशी गट नं. २५, प्रसाद सूर्यवंशी गट नं. १२, शिवराज सूर्यवंशी गट नं. १६, १८, २०, २१, विद्या सुभाष सूर्यवंशी गट नं. १६, १८, शितल सुरेश सूर्यवंशी गट नं. २६ यांचे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित १४ एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली होती. सध्या ऊस तोडणी हंगाम अवघ्या महिनाभरावर असतानाच हे पीक भस्मसात झाले आहे. एकूण अंदाजित नुकसान काही लाख रुपये इतके असून, काही शेतकऱ्यांचे हे एकमेव नगदी पीक होते.
दरवर्षी शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असतानाही महावितरणकडून कोणतीही योग्य कारवाई अथवा प्रतिबंधक उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळीही शेतकऱ्यांनी आग लागल्यानंतर तात्काळ महावितरण व महसूलला फोनवरून माहिती दिली मात्र उशिरापर्यंत ना कोणी पंचनामा केला, ना कोणी प्रत्यक्ष पाहणीस आले.
यावर्षी पावसाने समाधानकारक साथ दिल्याने उसाची वाढ चांगली झाली. एक महिन्याच्या आत ऊस तोडणीस येणार होता. मात्र शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचे सर्व श्रम वाया गेले. एक वर्ष मेहनत करून उभे केलेले पीक अशाप्रकारे आगीत भस्मसात झाल्याने मनस्ताप झाला. सरकारने मदत करावी, अशा घटनांवर कायमचा बंदोबस्त करावा, अशी भावना सुभाष सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. ऊस हे शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक असून त्यातून घरखर्च, शिक्षण, लग्न कार्य आणि इतर अनेक आर्थिक गरजा भागवल्या जातात. त्यामुळे या घटनेने शेतकऱ्यांच्या पाठीवर आर्थिक आणि मानसिक आघात केला.