![हिंगोली : पूर्णा-अकोला मार्गावर छपरा एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे संघर्ष समितीचे अंदोलन](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F11%2F%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : छपरा एक्सप्रेस पूर्णा-अकोला या रेल्वे मार्गावर सुरू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने आज सकाळी ११.३० वाजता गांधी चौकात अंदोलन करण्यात आले. या अंदोलनास व्यापारी, पत्रकार विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रेल्वेविषयक प्रश्नावर असलेली तीव्रता दर्शविली.
यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीने निवेदन पाठविले असून हिंगोलीचे अप्पर जिल्हाधिकारी परदेशी यांनी निवेदन स्विकारले. या प्रश्नावर असलेला जनआक्रोश रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ,असे परदेशी यांनी सांगितले. हिंगोली मार्गे छपरा एक्सप्रेस पूर्णा-अकोला या रेल्वे मार्गावरून सुरू करावी, अकोला-पूर्णा या मार्गावरून मुंबईला जाणारी रेल्वे सुरू करावी. तसेच जिल्ह्यातील व्यापार पेठेकरीता अत्यावश्यक असलेले गुड्सशेड तत्काळ उभारण्यात यावे, या मार्गावरील बंद असलेल्या सर्व गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, अशा अनेक मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले.
गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रेल्वे संघर्ष समितीचे बॅनर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. जालना-छपरा रेल्वे हिंगोली मार्गे धावलीच पाहिजे, हिंगोली-मुंबई रेल्वे मिळालीच पाहिजे, लडेंगे-जीतेंगे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.