

विशेष प्रतिनिधी
नांदेड : मुदखेड नगर परिषदेवर १९८५ साली भाजपाचा झेंडा फडकवत या पक्षाचे राज्यातील पहिले नगराध्यक्ष अशी नोंद आपल्या नावावर करणारे ज्येष्ठ नेते रामराव चौधरी यांनी आता याच पालिकेत भाजपाचा पराभव करण्याचा विडा उचलला असून ते आणि त्यांचे सहकारी काँग्रेस पक्षासाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
दुसऱ्या बाजूला २५ वर्षांपूर्वी ज्यांनी 'मुदखेड पॅटर्न'च्या माध्यमातून या नगर परिषदेतील भाजपा आणि चौधरीराज संपुष्टात आणले होते, ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण आणि त्यांची फौज या पालिकेमध्ये भाजपाची सत्ता आणण्यासाठी मुदखेडच्या मैदानामध्ये उतरली आहे. विशेष म्हणजे भाजपाने या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी ७मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सुरू असलेल्या रणसंग्रामात भोकर, देगलूर, कंधार, उमरी या नगरपालिकांसोबत मुदखेड नगरपालिकेच्या निवडणुकीलाही मोठे महत्त्व प्राप्त झाले असून खा. अशोक चव्हाण आणि त्यांच्या आमदार कन्येची तेथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
वयाची पंचाहत्तरी पार केलेले राम चौधरी मागील काही वर्षांपासून सक्रिय राजकारणातून अल्पित झाले. १९८५ ते २००० हा त्यांचा राजकीय बहराचा काळ ठरला. याच काळात ते नगराध्यक्ष राहिले. भाजपाने २५ वर्षांपूर्वी त्यांच्यावर वारंवार अन्याय करून त्यांचे खच्चीकरण केले. नंतर त्यांना पक्ष बदलावा लागला; पण पुन्हा पक्षात आल्यानंतरही पक्षाच्या राज्यातील या पहिल्या नगराध्यक्षाची भाजपातील नवनेतृत्वाने उपेक्षा आणि अवहेलना केली.
लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांत चौधरी यांनी मुदखेड परिसरातील आपला प्रभाव दाखवून दिला. २०२४ची लोकसभा निवडणूक तसेच वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुदखेड शहरामध्ये काँग्रेस उमेदवारास मताधिक्य मिळवून देण्यास चौधरी यांनी महत्त्वाचे योगदान दिले. अशोक चव्हाण भाजपात आल्यावर भाजपाचा लागोपाठ दोनदा पराभव झाला, ही बाब त्यांची राजकीय प्रतिमा खराब करणारी ठरली. पण विधानसभेला चव्हाण यांनी मुलीला निवडून आणल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला.
त्यानंतर वर्षभराने मुदखेडमध्ये स्थानिक पातळीवरच्या संस्थेची निवडणूक होत असताना प्रचारामध्ये अनेक मुद्दे मांडले जात आहेत. भाजपाला महायुतीतील दोन मित्रपक्षांनीच स्वतंत्रपणे आव्हान दिले आहे, तर दुसरीकडे राम चौधरी यांनी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसला आपल्या पसंतीचा उमेदवार द्यायला लावून या उमेदवारासाठी आपली राजकीय प्रतिष्ठा आणि आपला पूर्वीचा प्रभाव पणास लावला आहे.