

Naigaon Kuntur Harbhara crop fire
नायगाव : नायगाव तालुक्यातील कुंटूर शिवारात अज्ञात व्यक्तींनी हरभऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावल्याची घटना घडली असून या आगीत शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतमाल जाळण्याच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंटूर शिवारातील गट क्रमांक ३६३ मध्ये कुंटूर येथील मनोरमा अशोक सुगावे, सुनील अशोक सुगावे व आनंद अशोक सुगावे (रा. घुंगराळा) यांची सुमारे तीन हेक्टर शेती आहे. ही शेती त्यांनी वाटेकरी म्हणून गोविंद संतुका संभाडे (रा. कुंटूर) यांच्याकडे दिली होती. या शेतात यंदा हरभऱ्याची पेरणी करण्यात आली होती.
या शेतातून सुमारे ६० क्विंटल हरभरा उत्पादन अपेक्षित होते. मात्र ५ मार्च रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी शेतात प्रवेश करून हरभऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावली. त्यामुळे संपूर्ण ढिगारा जळून खाक झाला आणि शेतकऱ्यांचे सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच वाटेकरी गोविंद संभाडे यांनी कुंटूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सपोनि विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कंधारे या घटनेचा तपास करत असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आधीच अनिश्चित हवामान आणि बाजारभावातील चढउतारामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अशा घटना म्हणजे दुहेरी संकट असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश
शेतमाल काढणीच्या उंबरठ्यावर असताना हरभऱ्याचा ढिगारा जाळल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी आणि या प्रकारातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व संघटनांनी केली आहे.