

From today, all schools in Nanded will open in the morning
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : होळी सणानंतर उन्हाची तीव्रता वाढत आहे. या उन्हाच्या दाहकतेपासून शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या एकाच सत्रात चालविण्याचे आदेश गुरुवारी काढले आहेत. त्यानुसार जिल्हाभरातील सर्व शाळा (सीबीएसई वगळता) सकाळी एकाच सत्रात भरविण्यात येणार आहेत.
राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा परिषद नांदेड प्रशासनाने गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता शाळा सकाळी भरवण्याचे आदेश शिक्षण विभागाने निर्गमित केले आहेत.
शिक्षण विभागाने (प्राथमिक)
जारी केलेल्या पत्रानुसार, ६ मार्च २०२६ पासून सकाळी ८:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत या एकाच सत्रात शाळा भरविण्यात येणार आहेत. सकाळी ११:०० ते ११:२० या वेळेत जेवणाची वेळ आहे. दुपारच्या सत्रात भरणाऱ्या शाळांनीसुद्धा त्यांच्या वेळेत बदल करून, आवश्यक तासिका पूर्ण होतील अशा पद्धतीने मुख्याध्यापकांनी नियोजन करावे व त्याचे वेळापत्रक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करायचे आहे.
दुपारच्या वेळी मुलांना शाळेतून घरी जाताना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन बातमी लावली होती की शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी हा विद्यार्थीभिमुख निर्णय घेतला आहे.