

Nanded Khanapur Power Outage
खानापूर | खानापूर तालुक्यातील वझरगा परिसरातून जाणाऱ्या ४२० होल्ड मेन लाईनवरील अनेक वीज खांब जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून काही खांब वाकलेले आहेत. आधाराच्या तारा सैल झाल्याने हे खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या वारा व पावसाचा जोर वाढल्याने धोका अधिक तीव्र झाला असून या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने संभाव्य दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वीज खांब कोसळल्यास जीवितहानीसह वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यताही आहे.
ग्रामस्थांनी अनेकदा वीज वितरण विभागाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. धोकादायक खांब तातडीने बदलून नवीन खांब उभारावेत तसेच संपूर्ण लाईनची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खानापूर तालुक्यातील वझरगा गावात बसविण्यात आलेली नवीन वीज वितरण डीपी अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांना वारंवार वीज खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या वीज मागणीमुळे जुन्या डीपीवर अतिरिक्त भार पडत असून शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.
दरम्यान, गावातील अनेक वीज खांब जीर्ण व वाकलेल्या अवस्थेत असून पावसाळ्यात ते कोसळण्याचा धोका वाढला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नवीन डीपी तातडीने सुरू करावी, धोकादायक खांब बदलावेत आणि वीज यंत्रणेची सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तक्रारी करूनही महावितरणकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.