

नांदेड : नायगाव तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. जी संस्था 2014 मध्येच बंद पडली (अवसायनात निघाली), त्या संस्थेच्या नावाने चक्क 2024 पर्यंत धान्याची उचल करून ते काळ्या बाजारात विकले गेले. विशेष म्हणजे, संस्थेच्या सचिवाचे निधन झाल्यानंतरही त्यांच्या नावे खोट्या सह्या करून हा कारभार सुरू होता. प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या या महाघोटाळ्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर दोघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेना शहरप्रमुख गजानन तमलुरे यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. नायगाव येथील दत्ता हमाल औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित ही संस्था 31 डिसेंबर 2014 पासून अवसायनात होती आणि तिचा परवानाही रद्द झाला होता. असे असतानाही गैरअर्जदारांनी महसूल आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून 2014 ते 11 जानेवारी 2024 या तब्बल दहा वर्षांच्या काळात नियमित धान्याची उचल केली. हे धान्य गरजू लाभार्थ्यांना न देता ते परस्पर काळ्या बाजारात विकून शासनाची फसवणूक केली.
मयत सचिवाची सही, धान्याची उचल
या घोटाळ्यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, संस्थेचे सचिव शेषराव पैनलवार यांचे 2020 मध्ये निधन झाले होते. तरीही, त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या खोट्या आणि बनावट सह्या करून धान्याची उचल आणि विल्हेवाट लावण्याचे काम सुरू होते. मृत व्यक्तीच्या नावावर हा व्यवहार सुरू असताना पुरवठा विभागाने त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केली होती.
तक्रारदाराचा लढा अन् न्यायालयाचा दंडा
तक्रारदार गजानन तमलुरे हे स्वतः लाभार्थी असताना त्यांना संस्थेचा परवाना रद्द असल्याने वाटप बंद आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र, माहिती काढली असता 31.12.2014 पासून उचल सुरू असल्याचे दिसले. याप्रकरणी पोलीस आणि अधीक्षकांकडे तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाच्या आदेशाने नायगाव पोलिस ठाण्यात सय्यद रहीम सय्यद मीर (वय 58) आणि सय्यद रहेमान सय्यद मीर (वय 52, रा. पानसरे नगर, नायगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.