

नांदेड ः आणखी दोन वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची शताब्दी आहे. या पार्श्वभूमीवर ज्या दिवशी हा सत्याग्रह यशस्वी झाला, तो दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते महेंद्र पिंपळगावकर यांनी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी देशाची आर्थिक व राज्याची राजधानी मुंबईत पत्रके वाटप करुन जनजागृतीचा प्रयत्न केला.
सार्वजनिक पाणवठे समाजातील शेवटच्या नागरिकासाठी खुले असले पाहिजेत, ही आग्रही भूमिका घेत घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चवदार तळे म्हणून प्रसिद्ध असलेला तलाव सर्वांसाठी खुला केला. या सत्याग्रहात जनसमुदाय उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता.
मार्च 2027 मध्ये या सत्याग्रहाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा, अशी मागणी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पिंपळगावकर यांनी लाऊन धरली आहे.
राज्य मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्र्यांसह सर्व संबंधितांना त्यांनी लेखी पत्र व निवेदन देवून मागणी केली आहे. परंतु अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधीने या मागणीची हवी तशी दखल घेतलेली नाही. सध्या लोकसभा व विधानसभेचे सुद्धा हिवाळी अधिवेशन सुरु आहे.
याठिकाणी हा विषय उपस्थित होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत श्री पिंपळगावकर यांनी मुंबईतील चैत्यभूमी येथे जावून पत्रके वाटून आपल्या भूमिकेला व्यापक जनसमर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला.
जनजागृतीला व्यापक स्वरुप येण्याची गरज
चवदार तळ्याचा सत्याग्रह दिन राष्ट्रीय जल दिन घोषित व्हावा ही मागणी सबंध देशभर विशेषतः राज्यात सर्वत्र पोहोचली पाहिजे. या अनुषंगाने आंबेडकरी अनुयायांनी आपापल्या जिल्ह्यात, गावात, परिसरात या मागणी संदर्भात चर्चा घडवून आणावी व त्यांच्या पातळीवर प्रशासनाच्या संबंधितांकडे निवेदनाद्वारे आपली मागणी पुढे रेटावी, असा मुंबई येथे पत्रक वाटण्याचा हेतु होता, असे पिंपळगावकर यांनी सांगितले. सदर पत्रकाचे वाटप झाल्यानंतर अनेकांनी ही मागणी रास्त असून याबाबत आपल्या योगदानाची तयारीही दर्शवली.