

नांदेड - अमेरिका, इस्त्राईल या देशांनी इराणसह अनेक देशांवर ड्रोन, मिसाई हल्ले केल्याने अनेक देशात तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील आतापर्यंत 37 जण विविध देशांत अडकले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या 37 जणांचा संपर्क झाला असून, ही यादी वारंवार सुधारित होत असून, त्यामुळे विदेशात अडकलेल्यांची संख्या शेकडोत असल्याचे सांगण्यात येते मात्र, याची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.
युद्धपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेक देशांची विमानसेवा ठप्प पडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बाहेर देशात राहणारे व पर्यटक त्याठिकाणी अडकले आहेत. पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) या देशासह अनेक पर्यटक अडकले आहेत. नांदेड जिल्ह्यातील आतापर्यंत बहीरीन, कतार, दुबई, कुवैत, सौदी अरेबिया 37 जणांनी आपण या देशात अडकलो असल्याची माहिती दिली आहे. आणि आम्हाला सुखरुप भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या 247 हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
नांदेडच्या प्रशासनाचे आवाहन
नांदेडचे जिल्हा प्रशासनाने कुठलेही अफवा आणि खोट्या बाबींवर विश्वास ठेवू नये, खात्री असल्याशिवाय माहिती प्रसारीत करु नये, केंद्र व राज्यसरकार विविध देशात अडकलेल्यांचा संपर्कात आहेत. त्यांना योग्य ती मदत पुरवली जात असून, नांदेड जिल्ह्यातील विदेशात वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना कांही अडचणी असल्यास शासनाने दिलेल्या हेल्पलाईन नंबर तसेच जिल्हा प्रशासनाकडे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.