

Marathwada Rain Update :
मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिसवांपासून तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळं नदी नाले तुडूंब भरले असून अनेक महत्वाच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पावसामुळं मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला असून त्याची उभी पीकं या पावसामुळं वाहून गेली आहेत. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाची ही अवकृपा झाली आहे.
पैठण तालुक्या तलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडत असून नाथसागर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. तर माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. वरून तुफान पाऊस आणि धरणातून सुरू झालेला मोठा विसर्ग यामुळं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात नागरी वस्त्यांमध्ये शेतांमध्ये पाणी घुसलं आहे.
पैठण तालुक्यात सलग सोमवारी रोजी तिसऱ्या दिवशी मध्यरात्री दरम्यान मुसळधार पाऊस पडल्याने. नाथसागर धरणातून गोदावरी नदीत १ लाख ३ हजार रु ७५२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यासह नागरिक पुन्हा वरतून पाऊस पडत असल्याने शेतीसह घरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याचे तळ निर्माण झाल्याने नागरिक शेतकरी मात्र त्रस्त होऊन हवालदिल झाला आहे.
माजलगाव धरणाचे तीन मीटरने अकरा दरवाजे उघडल्याने सिंधफना नदी काठावरील अनेक गावांना पुराचा फटका बसला असून सांडू चिंचोली या गावाला पूर्ण पाण्याने वेडा दिला आहे. दरम्यान, एका महिलेच्या डिलिव्हरीसाठी एनडीएफ आर एच च्या तुकडीने सुखरूप बाहेर काढले.
भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात आज सकाळी जोरदार परतीचा पाऊस झाल्याने जुई नदीला मोठा पूर आला होता. या पूराचे पाणी येथील जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये शिरले. त्यामुळे या शाळेला तलावाचे स्वरूप आले होते.
दरम्यान 2011 साली झालेल्या पावसात पुरामुळे शाळेची संरक्षण भिंत खचून गेली होती तेव्हापासून आजपर्यंत या शाळेला संरक्षण भिंत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
आज सकाळी ७:३० वाजता बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पाचे सहा दरवाजे तीन मीटरने उघडले आहेत. मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे मांजरा धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वा. गेट क्रमांक १, २, ३, ४, ५ आणि ६ हे सहाही दरवाजे ३.०० मीटरने उघडले आहेत. त्या सहा दरवाजा मधून ५५११३.३० क्युसेक्स ( १५६०.८४ क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे. त्यामुळे नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन प्रशासन आणि मांजरा प्रकल्प धनेगाव पुरनियंत्रण कक्ष यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रात होत असलेला तुफान पाऊस पाहता आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता. राज्यात ओळा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्यांनी ट्विट केले की, 'मा. मुख्यमंत्री महोदय २०२० मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपण आणि मा. अजितदादा २०२२ मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपणही राज्यात #ओला_दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. पण आज त्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे. मा. #देवाभाऊ आपल्या पाठीशी केंद्र सरकारची ताकद तर मा. अजितदादा आपल्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळं राज्यात थैमान घातलेल्या अस्मानी संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी १५-२० हजार कोटींची मदत केली तर काही फरक पडणार नाही, असं मी म्हणतो आणि आपणही विरोधी पक्षनेते असताना म्हणाला होतात. प्रसंगी कर्ज घ्या पण संकटात असलेल्या आमच्या शेतकऱ्याला वाचवा.'