

Temperature at 41 degrees; avoid stepping out during the afternoon
किनगाव, पुढारी वृत्तसेवा : मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये. अति महत्त्वाचे काम असेल तर योग्य ती काळजी घेऊन बाहेर पडणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले जात आहे. सध्या तापमान हे ४१ अंशांच्या वर पोहचले आहे.
गेल्या महिन्यात सुरुवातीला उन्हाचा पारा कमी होता मात्र आता कांही दिवसापासून उन्हाचा पारा वाढत असल्याने सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. किनगाव परिसरात दुपारी तापमान ४१ अंशांच्या वर जात असून मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा बसत आहेत. या उन्हामुळे दुपारी कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे मात्र उन्हामुळे हाल होत असून अंगाची लाही लाही होत आहे.
उन्हाच्या वेळी मोटारसायकल स्वार मोठ्या रुमालाचा किंवा उपरण्याचा वापर करताना दिसत आहेत. अनेक शेतमजूर, व बांधकाम कामगार तसेच अनेक नागरिक कडक उन्हात काम करताना दिसत आहेत. दुपारी उन्हाच्या वेळी दुपारी १ ते ३ यावेळी काम करणे शक्यतो टाळणे गरजेचे आहे. मे महिन्यात ऊन अधिक वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे. अति महत्त्वाचे काम नसल्यास दुपारी घराबाहेर न पडलेलेच योग्य असून जर अति महत्त्वाचे काम असेल तर योग्य ती काळजी घेऊन घरा बाहेर पडणे गरजचे आहे.
तापमान वाढत असल्याने ग्रामीण भागात वयोवृद्ध नागरिकाचे व लहान मुलांचे हाल होत आहेत. नागरिकांनी उन्हाच्या पारी आपल्या कुटुंबातील लहान मुलांना उन्हात बाहेर पडू देऊ नये तसेच त्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाच्या वेळी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक महावितरण वर नाराजी व्यक्त करीत आहेत. विद्युत पुरवठा सुरुळीत ठेवण्याची मागणी होत आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाची लक्षणे : थकवा येणे, ताप येणे, शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे मानसिक बेचैनी व अस्वस्थता