

विठ्ठल कटके
रेणापूर : रोगांचा प्रादुर्भाव , अति पाऊस , सरकारच्या सोयाबीन खरेदीत झालेली अनियमितता व सोयाबीनच्या उत्पादनात होत असलेली घट या व इतर अनेक कारणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी संकटाचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात सोयाबीनचे भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु सोयाबीनचे भाव वर्षभरात चार हजारांच्या वर गेले नाहीत. ते 2026 च्या मार्च पर्यंत कायम होते.
मात्र एप्रील - मे या महिण्यात क्विंटल मागे सोयाबीनची दिड हजाराने वाढ झाली आहे. परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याऐवजी तो व्यापाऱ्यांनाच अधिक होतांना दिसत आहे. सोयाबीन बरोबरच ज्वारीच्या भावातही क्विंटल मागे दीड ते दोन हजार रुपयांची वाढ झालेली आहे. मात्र तूर, चना, मूग व राजमा या धान्याचे भाव क मी झाल्याचे चित्र आहे.
यावर्षी अतिवृष्टीने बहुतांश शेतकऱ्यांना फटका बसला. नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पुरात वाहून गेल्या. 2021 - 22 मध्ये सोयाबिनचे भाव प्रति क्विंटल दहा हजारांवर होते. त्यानंतर ते वाढलेच नाहीत. ते चार - साडेचार हजारांवरच स्थिरावले. आधारभूत खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करूनहि शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे माप होऊ शकले नाही. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विकले.
शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल 5 हजार 328 रुपये जाहिर केला होता. बाजारात एका क्विंटलमागे दिड हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला. अशा शेतकऱ्यांना हमी भाव व बाजार भाव यातील फरकाची रक्कम मिळाली नाही.
शेतीमालाचे उत्पादन कमी झाले तरीही बाजारात भाव वाढत नाहीत. शेतकऱ्यांना याचा दुहेरी फटका बसला. सोयाबीन बाजारात दाखल होऊ लागताच ऐनवेळी सरकारने हमी भाव खरेदीचे नियम बदलले त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. ऑनलाईन नोंदणीला विलंब , जाचक नियम व अटी यामुळे खरेदी केंद्रावर सोयाबीनची अपेक्षित नोंदणी झाली नाही.
भावांतर योजना राबविण्याची मागणी अद्याप पुर्ण झाली नाही. मागील पाच सहा महिन्यापासून सोयाबीन , तूर , उडीद व ज्वारीचे भाव कमी - अधिक होत गेले. 2025 मध्ये करडईला 9 हजार 300 रुपये प्रति क्विंटल भाव होता सध्या 5 हजार 900 रुपये आहे तीन चार महिण्यात तीन साडेतीन हजाराची घसरण झाली. अपेक्षेप्रमाणे मे 2026 मध्ये सोयाबीनच्या भावात प्रति क्विंटल दिड हजारांची वाढ झाली आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होतांना दिसत आहे.
नोहेंबर - डिसेंबर 2025 मधील व एप्रिल - मे 2026 मधील प्रति क्विंटल मध्ये धान्यांच्या भावात अशी चढ -उतार झाली, सोयाबीन - 4,640 - 6 ,350 , तूर - 6,770 - 7,560 , चना - 6,700 - 5,300, मूग - 9 , 700 - 7 , 800 , उडीद - 7,000 - 6,900 , ज्वारी - 3,000 - 4,500 , करडई - 9 ,300 - 5 ,880. तूर , चना, मूग व करडईच्या भावात मोठी घसरण झाली असून सोयाबीन व ज्वारीच्या भाव वाढल्याचे दिसून येत आहे.