

Monkeys trapped in Manjara riverbed due to floods
लातूर, पुढारी वृत्तसेवा: मांजरा नदीस आलेल्या पुरात नदीपात्रात असलेल्या सुबाभळीच्या झाडांवर तीन दिवसांपासून अडकलेल्या व उपासमार होत असलेल्या निलंगा तालुक्यातील चिंचोडी येथील वानरांना लातूर येथील आपत्ती निवारण कक्षाच्या शोध व बचाव पथकाने केळी व बिस्किटे देऊन भूतदयेचे अनोखे दर्शन घडवले. त्यांच्या या वन्यजीव सेवेचे सर्वत्र कौतूक होत आहे.
जिल्ह्यात गेली काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. धरणाची दारे उघडल्याने व धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने नद्यांना पूर येत आहे. नदीकाठची पिके पाण्यात गेली आहेत. निलंगा तालुक्यातील चिंचोडी येथे मांजरा नदीला पूर आला आहे. दरम्यान नदीपात्रात सुबाभळीची झाडे असून त्यास चहुबाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे. त्यावर सुमारे ८ ते १० वानरे व त्यांची चार पिले असून पुरामुळे ती गेली तीन दिवसांपासून अडकली आहेत. विशेष म्हणजे नदीचे पाणी वाढत असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते.
त्यांची एकप्रकारे उपासमार होत होती. तेथील गावकऱ्यांनी याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख डॉ. साकेव उस्मानी यांना कळवले. डॉ. साकेब यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना माहिती दिली व या वन्यजीवांची सुटका करावी व त्यांना फळे द्यावीत असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. डॉ. साकेब यांनी उदगीरच्या बचाव पथकास एक बोट देऊन घटनास्थळी पाठवले.
या पथकात गंगाधर खरोडे, सोमनाथ मादळे, अविनाश फुलारी, नागेश तुरे, उमाकांत गडारे, रत्नजीत पारखे, अरबाज शेख, शिवशंकर रावळे, राजकुमार चामले यांचा समावेश होता, विशेष म्हणजे वनरक्षक सोपान बडगने व वनकर्मचारी पिराजी पिटले हेही सोबत होते पथक तेथे पोहचले तथापि त्यांना पाहुन वानरे काहींसी बिथरली त्यांना बोटीतून आणणे शक्य नसल्याने पथकाने त्यांच्यासमवेत आण-लेल्या केळीच्या फनी माकडे असलेल्या झाडास बांधल्या वही मंडळी परतताच वानरांनी आपला उपवास सोडला.