

जिल्ह्यात चार नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर व २० डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचा कौल महायुतीच्या बाजूने लागला आहे. मतदारांनी महाविकास आघाडीला स्पष्टपणे धोबीपछाड देत पाचही ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी केले आहे.
नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीने रणसंग्राम जिंकल्याने जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजल्याचे चित्र आहे. निकाल महायुतीच्या बाजूने लागला असला,
तरी महायुतीमध्येच अहमदपूरमध्ये राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार अभय मिरकले (८,६७२) यांना धूळ चारत भाजपचे स्वप्निल व्हते यांनी ९,३९० मते मिळवून पराभूत केले. तर औशामध्ये राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या भगिनी परवीन शेख यांनी १२,४८८ मते मिळवून भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योती बनसोडे (११,२२७) यांना धक्का दिला.
निलंगामध्ये भाजपचे संजय हलगरकर यांनी ९,९२४ मते मिळवून नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा हात दाखवला आहे. तर देशमुख विरुद्ध कराड अशी प्रतिष्ठेची झालेली रेणापूर नगरपंचायत भाजपने पूर्ण ताकदीनिशी जिंकत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. येथे भाजपच्या उमेदवार शोभा अकनगिरे यांनी ६,९१५ मते मिळवून विजय संपादन केला, तर काँग्रेसच्या अर्चना माने यांचा ४,३४८ मतांनी पराभव झाला.
उदगीरमध्ये भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून काँग्रेसविरोधात लढत दिली होती. येथे शिंदे सेनेने स्वबळावर निवडणूक लढवली; मात्र भाजपच्या स्वाती हुडे यांनी २९,७०१ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसच्या कादरी अंजुम फातिमा सय्यद यांचा या लढतीत पराभव झाला.