

Bananas from Ahmedpur directly to Iranian market
नरसिंग सांगवीकर
अहमदपूर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजित उर्फ बालाजी रेड्डी यांच्या शेतातील सेंद्रिय पध्दतीने पिकवलेली केळी सातासमुद्रापार गेली असून इराकच्या बाजारात या केळीला दुप्पट भाव मिळाला आहे. रेड्डी यांनी आपल्या अहमदपूर येथील उच्च प्रतीच्या केळीची १६ डिसेंबर २०२५ रोजी ५५ अंतरावर ३००० रोपांची लागवड केली होती.
सुरूवातीपासून रासायनिक खतांना फाटा देत गाईचे शेणखत, गोमूत्र फवारणी, ठिबक सिंचनाद्वारे पाणी, गोमूत्र व जीवामृताचा वापर आदी नियोजनबद्ध बाबींमुळे पिकांची जोमदार वाढ होऊ शकली. आंतरमशागत व नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे बागेत कुठलाच रोग पडला नाही शिवाय योग्य पोषण झाल्याने झाड मोडून पडले नाही. परिणामी केळी पिकाची एकसमान वाढ झाली. लागवडीपासून अवघ्या सात महिन्यात केळीला वादी आली आणि दहा महिन्यांत केळी विक्रीसाठी तयार झाली.
कृषी सहायक अधिकारी विष्णू कलमे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी केळी लागवडीचा निर्णय घेतला. स्थानिक बाजारात ८ ते ९ रुपये प्रति किलो दर मिळत असताना निर्यात झाल्यामुळे त्यांना १७ ते १८ रुपये प्रति किलो इतका दुप्पट दर मिळाला आहे. केळी लागवडीपासून काढणीपर्यंत १,५०,००० रुपये खर्च आला असून, अपेक्षित ९० टन उत्पादनातून १७,००० रुपये प्रति टन दराने त्यांना १५,३०,००० रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
या उपर अहमदपूरची केळी सातासमुद्रापार इराकला पोहोचली हा आनंद वेगळाच. केळीची पहिली तोड करून वाहनात भरून केळी रवाना झाली असून या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी शेतात जाऊन बागेची पाहणी केली. यावेळी तलाठी अविनाश पवार, भारत सांगवीकर माधव कासले, अनिकेत फुलारी, आयुब, शिवा कासले, शिवकुमार बेद्रे, शिवा भारती, अजित सांगवीकर, बबन फुलमंटे, ऋषी हालसे मारुती मरेवाड रंगनाथ गिरी, वसंत पवार, गोविंद काळे आदींची उपस्थिती होती.